लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: भिवंडीतील वाडा महामार्गावरील खड्ड्यामुळे दुचाकीवरुन तोल जाऊन आकाश जाधव (२२) या तरुणाचा ३१ ॲागस्टला अपघात होऊन मृत्यू झाला होता. त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गणेशपुरी पोलिसांनी गुरुवारी रस्त्याचा ठेकेदार मे. जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर्स प्रा.लि कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे.

आकाश जाधव हा त्याच्या मित्रासह ३१ ॲागस्टला भिवंडीहून मुंबईच्या दिशेने दुचाकीवरून प्रवास करत होता. वाडा जवळील रस्त्यावरील खड्यामुळे दुचाकीचा तोल जाऊन त्यांचा अपघात झाला. यामध्ये आकाशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्याच्या मित्रालाही दुखापत झाली. आकाशला उपचारासाठी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा… भिवंडीत महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपचारादरम्यान आकाशचा मृत्यू झाला. ज्या मार्गावर आकाशचा अपघात झाला, तो रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो. या रस्त्याचे काम मे. जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर्स प्रा.लि या कंपनीला देण्यात आले होते. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा देयके काढण्यात आली, परंतू रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही. आकाशच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गणेशपूरी पोलीस ठाण्यात रस्त्याच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास करुन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धर्मराज सोनके यांनी दिली.