Premium

ठाणे जिल्ह्यात भाजीपाल्याचे मुबलक उत्पादन; यंदा ४४६ मेट्रिक टॅन भाजीपाल्याची निर्यात

जिल्ह्यात भाजी पिकांचे चांगले उत्पादन झाल्याने जिल्ह्यातून सुमारे ४६६ मेट्रिक टन भाजीपाल्याची परदेशात निर्यात करण्यात आली आहे.

abundant production vegetables thane district
ठाणे जिल्ह्यात भाजीपाल्याचे मुबलक उत्पादन; यंदा ४४६ मेट्रिक टॅन भाजीपाल्याची निर्यात (संग्रहित छायाचित्र)

भेंडीची निर्यात अधिक; १२ हुन अधिक देशांत भाजीपाल्याची निर्यात

ठाणे: भाजीपाला तसेच इतर पिकांच्या उत्पादनात मक्तेदारी असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बरोबरच ठाणे जिल्ह्यातही मागील काही वर्षांपासून भाजीपाल्याचे मुबलक उत्पादन होत आहे. यावर्षीही जिल्ह्यात भाजी पिकांचे चांगले उत्पादन झाल्याने जिल्ह्यातून सुमारे ४६६ मेट्रिक टन भाजीपाल्याची परदेशात निर्यात करण्यात आली आहे. यामध्ये मुरबाड आणि शहापूर तालुक्यात पिकविण्यात आलेल्या भेंडीचा समावेश आहे. तर भेंडी बरोबरच मिरची, दुधी भोपळा, ढोबळी मिरची, रताळे यांसारख्या पिकांचा समावेश आहे. मागील वर्षी सात देशांमध्ये जिल्ह्यांतील भाजीपाल्याची निर्यात करण्यात आली होती. यावर्षी निर्यात क्षमतेमध्ये वाढ होऊन तब्बल १२ देशांमध्ये भाजीपाल्याची निर्यात करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील काही वर्षांपासून ठाणे जिल्हा कृषी क्षेत्रात विविध प्रयोग राबविताना दिसून येत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात पाऊस मुबलक झाल्याने भाताचे अधिक उत्पादन झाले होते. तसेच आंबा, सीताफळ यांसारख्या फळांची तसेच मोगऱ्याची शेती, भाजीपाला यांचीही काही हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. याच पद्धतीने यंदाही काही हजार हेक्टरवर खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या विविध पिकांची लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. मागील वर्षी ही कृषी विभागाकडून सुमारे तीन हजार हेक्टरवर भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली होती.

हेही वाचा… अंबरनाथमध्ये डायलेसिस सुविधा; रोटरीचा पुढाकार, अल्प उत्पन्न गटातील रुग्णांसाठी विनामूल्य

यामध्ये सुमारे १ हजार ५६० हेक्टर क्षेत्रावर भेंडीची लागवड करण्यात आली होती. तर उर्वरित क्षेत्रावर भेंडी, कारले, दुधी भोपळा, वांगी, ढोबळी मिरची, काकडी, पडवळ, मुळा, घोसाळी रताळे या फळभाज्यांबरोबरच इतर पालेभाज्यांची लागवड करण्यात आली होती. याचे उत्तम उत्पादन झाल्याने सुमारे जिल्ह्याभरातुन मागील काही महिन्यांच्या कालावधीत सुमारे ४४६ मेट्रिक टन भाजीपाल्याची परदेशात निर्यात करण्यात आली आहे. यामध्ये निम्म्याहून अधिक हे भेंडी असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. तर या भाजीपाला निर्यातीमुळे शेतकऱ्यांचेही उत्तम अर्थार्जन झाले आहे.

हेही वाचा… डोंबिवली एमआयडीसीतील सिस्टर निवेदिता शाळा रस्त्यावरील पथदिवे बंद

जिल्ह्यातून निर्यात करण्यात आलेल्या भाजी पिकामध्ये भेंडीची अधिक निर्यात करण्यात आली आहे. या भेंडी पिकांच्या सुमारे १ हजार ४२२ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. तर यामध्ये ५३१ लाभार्थी शेतकरी हे शहापूर, ४०६ लाभार्थी मुरबाड, ३५५ भिवंडी आणि उर्वरित लाभार्थी हे अंबरनाथ आणि कल्याण या तालुक्यांतील आहे.

ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, फ्रांस, जर्मनी, इटली, जपान, केनिया, न्यूझीलंड, कतार, स्पेन, थायलंड या देशांमध्ये ठाणे जिल्ह्यांतही भाजीपाल्याची निर्यात करण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 19:42 IST
Next Story
अंबरनाथमध्ये डायलेसिस सुविधा; रोटरीचा पुढाकार, अल्प उत्पन्न गटातील रुग्णांसाठी विनामूल्य