लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर भागात आरोग्य उत्तम राहावे म्हणून चालण्यासाठी गेलेल्या एका ४२ वर्षीय महिलेला मोटार चालकाने भरधाव वाहन चालवून धडक दिल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला आहे. नीलम पटवर्धन (४२) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांच्या पायाला अस्थिभंग झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच वरळी सी-फेस येथे एका भरधाव मोटारीच्या धडकेत धावपटू राजलक्ष्मी रामकृष्णन (५८) यांचा मृत्यू झाला होता. ठाण्यात असे प्रकार टाळण्यासाठी धावपटूंनी स्वाक्षरीचे पत्र महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना दिले होते. असे असतानाही अपघात झाल्याने धावपटूंमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
घोडबंदर येथील आझादनगर भागात निलम पटवर्धन या वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास त्या येऊरमध्ये चालण्यासाठी गेल्या होत्या. उपवन जवळ असलेल्या येऊरच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर निलम पोहचल्या असता, त्यांच्या पाठीमागून एक भरधाव मोटार आली. त्या मोटार चालकाने निलम यांना धडक दिली. या धडकेत निलम यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर मोटार चालक फरार झाला. घटनेनंतर काही नागरिकांनी त्यांना उपचारासाठी वर्तकनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या पायाला अस्थिभंग झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे सीसीटीव्ही मिळविले जात असून याप्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आणखी वाचा- कल्याणमध्ये मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील प्रवासी ठार
काही दिवसांपूर्वीच वरळी येथील सी-फेस परिसरात धावपटू राजलक्ष्मी रामकृष्णन या धावत असताना त्यांना भरधाव मोटारीने दिली होती. या धडकेत राजलक्ष्मी यांचा मृत्यू झाला होता. ठाणे शहरातील उपवन, येऊर, वसंत विहार, हिरानंदांनी मेडोज, पाचपाखाडी सेवा रस्ता, बाळकूम या भागात अनेकजण पहाटे ५ ते सकाळी ८ यावेळेत चालण्यासाठी आणि धावण्यासाठी जात असतात. ठाण्यातील अनेक नामवंत व्यक्तीही या भागात धावण्यासाठी येत असतात. तसेच विविध मॅरेथॉनमध्ये भाग घेणारे धावपटूही येथे सराव करत असतात. त्यामुळे ठाण्यातील २०० हून अधिक धावपटूंनी भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यासंदर्भाचे पत्रही त्यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना दिले होते. परंतु त्यानंतरही प्रशासनाकडून उपाययोजना झाली नसल्याचे धावपटूंचे म्हणणे आहे.
येऊर, उपवन भागात हजारो नागरिक सकाळच्या वेळेत आरोग्य उत्तम राहावे यासाठी चालत असतात. येऊर येथील घटना अतिशय गंभीर असून प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. येथे पोलीस बंदोबस्त ठेवला पाहिजे. तसेच सकाळी दोन ते अडीच तासांसाठी येथील रस्ते केवळ चालण्यासाठी खुले ठेवणे आवश्यक आहे. यासंदर्भात मंगळवारी पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. -डॉ. महेश बेडेकर, धावपटू.