Badlapur School Case : बदलापूर येथील आदर्श शाळेत गेल्या आठवड्यात तीन वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले होते. पालकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी वैद्यकीय तपासणी केली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी १२ तास लावले आणि शाळा प्रशासनानेही घटनेकडे दुर्लक्ष केल्याने शहरात संतापाची लाट पसरली. दरम्यान, या प्ररकणातील एका मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणासंदर्भात एफआयआरमध्ये नोंदवलेली माहिती समोर आली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

एफआयआरनुसार, ही घटना १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२ वाजेच्या दरम्यान घडली. दोन मुलींपैकी एका मुलीच्या कुटुंबाला १३ ऑगस्ट रोजी संशय आला, त्यांनी दुसऱ्या मुलीच्या कुटुंबातील सदस्याशी बोलल्यानंतर आपण लैंगिक अत्याचाराची तक्रार करण्यास जात असल्याचे सांगितले. यानंतर मुलीच्या पालकांनी तिला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्याचा निर्णय घेतला. मुलगी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती. तिने तिच्या पालकांना सांगितलं की दादाने तिचे कपडे काढले होते.

कुटुंबीयांनी सांगितले की त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती १६ ऑगस्ट रोजी दिली होती. परंतु, पोलिसांनी १२ तासांनंतर, १६ ऑगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास एफआयआर नोंदवल्याचा आरोप त्यांनी केला. शाळेत शिपाई असलेल्या आरोपीने मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख आहे.

अक्षय शिंदे असं या आरोपीचं नाव असून त्याला लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि कलम ६५(२) (बारा वर्षांखालील मुलीवर बलात्कार), ७४ (आक्रोश करण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला किंवा फौजदारी बळजबरी), भारतीय न्याय संहिता ७५ (लैंगिक छळाचे गुन्हे), आणि ७६ (अपघात किंवा गुन्हेगारी बळाचा वापर) या अंतर्गत अटक करण्यात आली.

हेही वाचा >> लोकप्रकोप : शाळेत मुलींवरील अत्याचारानंतर बदलापुरात संतापाची लाट; पालक, नागरिकांच्या आंदोलनामुळे रेल्वे सेवा दहा तास ठप्प

संपूर्ण बदलापूर उतरले रस्त्यावर

शहरातील काही राजकीय पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी २० ऑगस्ट रोजी बदलापूर बंदची हाक देत आंदोलनाची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत सकाळी सहा वाजल्यापासून शाळेबाहेर पालकांनी निदर्शने केली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी करत करत साडेअकराच्या सुमारास आक्रमक आंदोलकांनी शाळेत प्रवेश केला व वर्ग तसेच शालेय साहित्याची नासधूस केली. त्याचवेळेस काही आंदोलक रेल्वे स्थानकाकडे गेले व त्यांनी रुळांवर ठिय्या मांडला. बदलापूर रेल्वे सेवा संपूर्ण ठप्प झाली.

मंत्री गिरीश महाजन यांच्यासह लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधींनी विनवणी करूनही आंदोलक हटले नाहीत. अखेर पावणेसहाच्या सुमारास पोलिसांनी लाठीमार सुरू केला. त्यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. स्थानकाबाहेर आंदोलकांनी काही खासगी गाड्या फोडल्या. अखेर रात्री सव्वाआठच्या सुमारास आंदोलकांना हटविण्यात पोलिसांना यश आले. दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंदोलकांनी शहरातील मुख्य रस्ते, उड्डाणपूल बंद केल्याने शहरांतर्गत वाहतुकीलाही फटका बसला. लोकल सेवा बंद पडल्याने प्रवासी अंबरनाथपर्यंत येऊन तेथून रिक्षा किंवा मिळेल त्या वाहनाने बदलापूर गाठण्याचा प्रयत्न करत होते. मात्र शहराचे प्रवेशद्वार बंद केल्याने त्यांना पायपीट करत घर गाठावे लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरक्षित बहीण योजना द्या !

आंदोलनात महिला आणि तरुणींचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. राज्यात सुरू असलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार सरकारकडून मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मात्र ‘लाडकी बहीण योजना, नको तर सुरक्षित बहीण योजना द्या’ अशी मागणी करणारे फलक बदलापूरकरांनी यावेळी झळकविले.