Badlapur School Case Devendra Fadnavis Remark : बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून दिरंगाई केली गेली, असा आरोप केला जात आहे. त्यानंतर संतापलेल्या पालकांनी आज (२० ऑगस्ट) शाळेत आंदोलन केलं. तर बदलापूरमधील नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे. पाठोपाठ त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केलं. सकाळी सहा वाजल्यापासून शाळेसह बदलापूर परिसरात व रेल्वेस्थानकात आंदोलनं चालू आहेत. दरम्यान, दुपारी अडीच वाजता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी फडणवीस यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅक न्यायालयात हा खटला चालवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल.

ही १३ ऑगस्टची घटना असून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप होत आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, पालक पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तातडीने कारवाई झाली आहे. परंतु, कोणी जाणीवपूर्वक दिरंगाई केली का? कोणी हे प्रकरण लपवून ठेवलं होतं का? याची चौकशी केली जाईल. एसआयटीमार्फत चौकशी करून दिरंगाई करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास कोणी उशीर केला असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. आम्हाला याप्रकरणी लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करून फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवायचा आहे. त्यानुसार तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

आरोपीला फाशी देण्याच्या मागणीबाबत फडणवीस काय म्हणाले?

बदलापुरातील आंदोलनाबाबत फडणवीस म्हणाले, बदलापूर व रेल्वेस्थानकात आंदोलन करणारा जमाव स्वयंस्फूर्तीने आला आहे की इतर काही गोष्टींमुळे लोक जमले आहेत यावर मी काही बोलणार नाही. हा लोकांच्या भावनांचा उद्रेक असू शकतो. गुन्हेगाराला तात्काळ फाशी द्या अशी मागणी लोकांनी केली आहे. मात्र कायद्याच्या मार्गाने जे काही तातडीने करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासंदर्भात संवेदनशीलतेने काम करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. कुठेही दंगा होऊ नये याची काळजी घेतली जात आहे.

हे ही वाचा >> Badlapur School Case : “ती भाजपाशी संबंधित लोकांची शाळा”, बदलापूर प्रकरणावरून उद्धव ठाकरे आक्रमक; म्हणाले, “आरोपी भाजपाचा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजीनाम्याच्या मागणीवर काय म्हणाले?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावरून, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री फडणवीस व शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर फडणवीस म्हणाले, विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्ये राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. विरोधकांनी किमान अशा घटनांमध्ये राजकारण करायचं नसतं. या घटनेनंतर लोकांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या मनातलं राजकारण बाहेर येत आहे.