मध्य रेल्वेच्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मंगळवारी ‘सुट्टीच्या वेळापत्रका’चा फटका सहन करावा लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्याने रेल्वेने मंगळवारी सुट्टीचे वेळापत्रक राबवून सकाळच्या गाडय़ांची संख्या कमी केली. मात्र, सुट्टी नसलेल्या खासगी कार्यालयांतील नोकरदारांना याचा मोठा फटका सहन करावा लागला. त्यामुळे सकाळी ६ ते ८ या कालावधीत ठाणे रेल्वेस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.
सुट्टीच्या दिवशी मध्य रेल्वेच्या मार्गावर प्रवाशांची संख्या निम्म्याने घटत असल्याचे कारण देत रेल्वेकडून लोकलच्या फेऱ्यांची संख्या कमी करण्यात येते. आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारीही रेल्वेने हे वेळापत्रक राबवले. त्यामुळे सकाळी सहा ते आठ या कालावधीत लोकलच्या फेऱ्यांची संख्या कमी होती. त्यातच अनेक अर्धधिम्या लोकल रद्द करण्यात आल्याने दिवा, कळवा, मुंब्रा येथील प्रवाशांना धिम्या लोकलनेच प्रवास करावा लागला. परिणामी ठाणे स्थानकात प्रवाशांची गर्दी होती.

रोज प्रवास करणाऱ्या सुमारे ४० ते ४२ लाख प्रवाशांच्या तुलनेत रविवार आणि सुट्टीच्या दिवशी प्रवाशांची संख्या २४ ते २५ लाखांपर्यंत कमी होते. तसेच सुट्टीच्या दिवशी सकाळच्या वेळी लवकर रेल्वेने प्रवास करण्यापेक्षा सुट्टी असल्याने प्रवासी उशिरा प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात. त्यामुळे सकाळी ६ ते ८ या दोन तासांतील गाडय़ांची संख्या कमी करण्यात आली.
– नरेंद्र पाटील, रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी

सरकारी सुट्टय़ांप्रमाणे खासगी कार्यालयांना सुट्टी असतेच असे नाही. परंतु सरकारी सुट्टीप्रमाणेच रेल्वे सुट्टीचे वेळापत्रक ठरवते. याचा फटका खासगी कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. अनेकांना कामावर पोहचणेसुद्धा कठीण होते. त्यामुळे खासगी कार्यालयांनासुद्धा सरकारी सुट्टीप्रमाणेच सुट्टी देण्यासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारने आदेश करणे गरजेचे आहे.
– विनायक थत्ते, ठाणे.