Mumbai Local Train Accident near Mumbra Station : मुंबईजवळ दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मोठा रेल्वे अपघात झाला आहे. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) जणाऱ्या लोकल रेल्वेमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सकाळी ९.२० च्या दरम्यान, दिवा व मुंब्रा स्थानकांच्या दरम्यान ही घटना घडली आहे. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाज्यात (फूटबोर्ड) लटकत उभे होते. त्याचवेळी बाजूने जाणारी लोकल या प्रवाशांना घासून गेली. या लोकलच्या धक्क्याने आठ प्रवासी दरवाजातून खाली पडले. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) जाणारी लोकल प्रवाशांनी गच्च भरली होती. काही प्रवासी फूटबोर्डवर उभे राहून प्रवास करत होते. त्याचवेळी सीएसएमटीवरून डाऊन दिशेला जाणारी एक लोकल समोरून आली. ज्या ठिकाणी या दोन्ही लोकल गाड्या एकमेकांच्या बाजूने जात होत्या तिथे दोन रेल्वेरुळांमधील अंतर कमी आहे. तसेच अनेक प्रवासी दरवाजात उभे होते, त्यांच्या पाठीवर बॅगा देखील होत्या. हे प्रवासी डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलला घासले गेले, त्यांच्या बॅगा दुसऱ्या लोकलवर आदळल्या. त्यामुळे दरवाजात उभे असलेले आठ प्रवासी खाली पडले.
प्रचंड गर्दीमुळे अपघात
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी या घटनेनंतर पत्रकार परिषद घेतली. स्वप्नील नीला या घटनेची माहिती देत म्हणाले, “आम्हाला त्या लोकलमधील प्रवाशांनी व गार्डने साडेनऊच्या सुमारास फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आम्ही तातडीने या प्रवाशांसाठी रुग्णवाहिका पाठवली. ९.५० च्या दरम्यान रुग्णवाहिका व रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना रुग्णालयात नेलं”.
“पुष्पक एक्सप्रेसचा या अपघाताशी संबंध नाही”
दरम्यान, काही वृत्तवाहिन्यांनी दावा केला होता की सीएसएमटीहून लखनौला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवासी पडले आहेत. तर काही माध्यमांनी म्हटलं होतं की पुष्पक एक्सप्रेस व कसारा-सीएसएमटी लोकल बाजूने जात असताना ही दुर्घटना घडली आहे. मात्र, पुष्पक एक्सप्रेसचा या अपघाताशी काहीही संबंध नसल्याचं मध्य रेल्वेने स्पष्ट केलं आहे.