लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे – फलाटावरील चुकीच्या उद्घोषणांमुळे उपनगरीय रेल्वेगाडी पकडण्यात होणारा गोंधळ मध्य रेल्वेवरील प्रवाशांना काही नवीन नाही. मात्र आता रेल्वे स्थानकातील चुकीच्या उद्घोषणांनंतर धावत्या लोकलमध्ये होणाऱ्या ” पुढील स्थानक ” अशा कानी पडणाऱ्या घोषणा देखील बहुतांश वेळा चुकीच्या होत असल्याने प्रवाशांचा चांगलाच गोंधळ उडत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. यामुळे किमान धावत्या लोकल गाड्यांमधील उद्घोषणांमध्ये तरी गोंधळ नको, अशा प्रतिक्रिया आता प्रवाशांमधून उमटत आहे.

मध्य रेल्वेवरून दिवसभरात लाखो प्रवासी उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून प्रवास करत असतात. यामध्ये कर्जत, कसारा, कल्याण येथून ठाणे आणि मुंबई येथे रोज नियमित आपल्या कार्यालयीन कामासाठी बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. गेल्या काही वर्षात प्रवाशांची वाढती गर्दी पाहता मध्य रेल्वे प्रशासनाकडून लोकल गाड्यांची संख्या वाढविणे, तिकीट काढतेवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून तिकीट काढण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणे तसेच ऑनलाईन पद्धतीने लोकल गाड्यांचे वेळापत्रक उपलब्ध करून देणे, गाडी नेमकी कोणत्या स्थानकात आहे याची व्यवस्था उपलब्ध करून देणे यांसारख्या अनेक सुविधा मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येतात. तर धावत्या गाडीतील प्रवाशांसाठी सोयीचे व्हावे म्हणून काही वर्षांपूर्वी प्रत्येक डब्ब्यात स्थानक नामदर्शक बसविण्यात आले. तर पुढील स्थानक सांगणाऱ्या उद्घोषणा देखील सुरू करण्यात आल्या. यामुळे अत्यंत गर्दी अस्ताता आणि बाहेरील स्थानक ही दिसत नसताना प्रवाशांना या सुविधेमुळे पुढील स्थानक कळण्यास मोठी मदत होऊ लागली.

आणखी वाचा-कल्याण-डोंबिवलीत मालमत्ता कर, पाणीपट्टी सवलतीची अभय योजना

मात्र आता याच उद्घोषणा चुकीच्या होत असल्याने आणि अनेकदा नामदर्शकामध्ये चुकीचे स्थानक दाखवत असल्याने प्रवाशांचा मोठा गोंधळ होतो. यामुळे आपण योग्य गाडीतच चढलो आहोत की नाही याची खातरजमा करण्यासाठी गर्दीमध्ये कोंडलेल्या प्रवाशांना गाडीच्या दारावर लटकणाऱ्या प्रवाशांकडून खातरजमा करून घ्यावी लागते आणि सध्या बहुतांश गाड्यांमध्ये हेच चित्र दिसून येते. त्यामुळे या रोजचा सावळा गोंधळ नियमित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आपल्या प्रवासाचा एक भागच झाला आहे. मात्र बाहेरून येणाऱ्या आणि लोकलने फार कमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हा गोंधळ भीतीदायक आणि संभ्रमावस्थेत टाकणारा आहे. त्यामुळे किमान धावत्या लोकल गाड्यांमधील उद्घोषणांमध्ये तरी गोंधळ नको, अशा प्रतिक्रिया आता प्रवाशांमधून उमटत आहे. तर काही वेळा उद्घोषणा देणाऱ्या यंत्रणेमध्ये थोडासा तांत्रिक बिघाड झाल्यास अशा उद्घोषणा ऐकू येण्याची शकत्या आहे. मात्र असा तांत्रिक बिघाड होऊ नये यासाठी मध्ये रेल्वे प्रशासन कायम सतर्क असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आणखी वाचा-जितेंद्र आव्हाड यांनी दिला मंत्री सरनाईकांना मित्रत्वाचा सल्ला

अंध, अपंग प्रवाशांची धांदल

चुकीच्या उद्घोषणा आणि गाडीतील दर्शकावर दिसणारे चुकीचे नाव हे अपंग बांधवांसाठी मोठे गैरसोयीचे ठरत आहे. यामुळे अनेकदा गाडी स्थानकातून बाहेर पडल्यावर होणारी चुकीची उद्घोषणा गोंधळून टाकत आहे. तर अंध बांधवांसाठी या घोषणा अत्यंत महत्वाच्या असल्याने याच चुकीच्या होत असल्याने अनेकदा ते उद्घोषणा झाल्यावर आपण चुकीच्या गाडीत शिरलो अशा गोंधळलेल्या स्थितीत दिसून येतात. अशा वेळी त्यांच्या सह प्रवाशांकडून त्यांना मदत केली जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फलाटावर देखील लोकल गाडी येण्यापूर्वी होणाऱ्या चुकीच्या घोषणा प्रवाशांसाठी काही नवीन नाही. मात्र आता धावत्या गाडीतही अनेकदा चुकीच्या उद्घोषणा होत असल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ स्थिती निर्माण होते. -महेश कदम, प्रवासी, अंबरनाथ