ठाणे : लाचप्रकरणात अटक करण्यात आलेले ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांची पात्रता नसतानाही त्यांच्याकडे उपायुक्त पदाचा पदभार देण्यात आल्याचा गंभीर आरोप करत यासंबंधीचे पुरावे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी सादर केले आहेत. पाटोळे यांना उपायुक्तपदी बसवणे म्हणजे ठाणेकर जनतेच्या विश्वासाशी केलेला विश्वासघात आहे, असे सांगत आयुक्तांनी राजकीय दबावाखाली घेतलेला हा निर्णय महापालिकेच्या प्रतिमेवर काळा डाग आहे,” अशी टिकाही त्यांनी केली आहे.
एका बांधकाम व्यावसायिकाकडून २५ लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली. यानंतर या प्रकरणाचा तपास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्यात आला. या कारवाईनंतर शंकर पाटोळे यांच्या कार्यपद्धतीविषयी आणि पालिकेच्या कारभारावर टिका होत आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनीही आता शंकर पाटोळे यांच्या पदोन्नतीवर बोट ठेवत पालिका प्रशासनावर टिका केली आहे. २००४ मध्ये उप समाजविकास अधिकारी म्हणून लागलेले पाटोळे, २०१० मध्ये समाजविकास अधिकारी झाले. त्यानंतर सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे देण्यात आला. या काळात संवेदनशील प्रभाग समित्यांमध्ये काम करत असल्याचे दाखवून सहाय्यक आयुक्त पदाची पदोन्नती घेतली.
सहाय्यक आयुक्त पदावरील नियुक्तीस मान्यता मिळण्याबाबतच्या पालिकेच्या पत्राच्या अनुषंगाने शासनाने माहिती सादर करण्यास सांगितले असता प्रस्तावात नमूद केलेल्या अधिकाऱ्यांचे विभागीय चौकशी चालू अथवा प्रस्तावित नसल्याचा प्रथम अहवाल महापालिकेने दिला आणि याबाबतच्या दुसऱ्या अहवालात मात्र शंकर पाटोळे यांचेबाबत बीएसयुपी अनियमितता, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील तक्रार, अनधिकृत बांधकामांना दिलेले संरक्षण, तसेच नागरिकांकडून आलेल्या तक्रारी प्रलंबित असल्या बाबत सदर केले. परंतु शासनाने आजवर पाटोळे यांच्या सहाय्यक आयुक्त पदालाच मान्यता दिलेली नाही, हे धक्कादायक वास्तव असून, अशा स्थितीत त्यांची पदोन्नती ही पूर्णपणे बोगस आणि बेकायदेशीर असल्याचा दावा पिंगळे यांनी केला आहे.
शंकर पाटोळे यांची २०१८ ते २०२१ या कालावधीत झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत चौकशी चालू असताना आणि सहाय्यक आयुक्त पदाची शासन मान्यता नसताना उपायुक्तपदी नेमल्याने महापालिकेच्या कारभारातील ‘भ्रष्टाचाराचा गड’ उघड झाल्याची टिका पिंगळे यांनी केली आहे. आम्ही अनेकदा पुराव्यानिशी आयुक्तांकडे तक्रारी दाखल केल्या. तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनीसुद्धा या अधिकाऱ्याची कारकीर्द भ्रष्टाचाराने बरबटलेली असल्याचे लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले. पण तरीही या अधिकाऱ्याला राजकीय आशीर्वादाने अभय देण्यात आले. ठाणेकरांची ही थेट फसवणूक आहे, असा आरोपही त्यांनी केला. आम्ही आता सार्वजनिक बांधकाम, स्थावर मालमत्ता, घनकचरा आणि शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर आणणार आहोत. आयुक्तांनी राजकीय दबावाला बळी न पडता कारवाईची भूमिका घेतली नाही, तर काँग्रेस रस्त्यावर उतरून ठाणेकरांसाठी लढेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.