लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: ठाकुर्ली जवळील खंबाळपाडा येथील तलावातील पाणी कडक उन्हामुळे आटले आहे. या तलावातील मासे मरण पावले आहेत. तलावाच्या चारही बाजुने मासे मृत झाल्याने त्याची दुर्गंधी मागील काही दिवसांपासून खंबाळपाडा भागात पसरल्याने रहिवासी हैराण आहेत.

तलावात मे अखेरपर्यंत खळग्यात पुरेसे पाणी असते. त्यात मासे तग धरुन राहतात. यावेळी कडक उन्हाळा असल्याने तलावातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होऊन तलावातील पाणी आटले. त्याचा फटका माशांना बसला आहे, अशी माहिती खंबाळपाडाचे रहिवासी काळू कोमसकर यांनी दिली.
तलावातील मृत मासे खाण्यासाठी भटक्या कुत्र्यांची झुंबड उडाली आहे. भटकी कुत्री मासे नागरी वस्तीच्या विविध भागात आणून टाकतात. अनेक वेळा रस्त्यावरुन येजा करताना प्रवाशांना मासे दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.

हेही वाचा… डोंबिवलीतील रिजन्सी अनंतम संकुलातील पाणी टंचाईने रहिवासी हैराण

खंबाळपाडा तलाव पुरातन आहे. या तलावातील गाळ काढून टाकला तर त्याची खोली वाढेल. अधिकचा पाणी साठा तलावात राहिल, अशी सूचना रहिवासी आणि रिक्षा संघटनेचे पदाधिकारी काळू कोमासकर यांनी पालिका अधिकाऱ्यांना केली आहे. त्याची दखल घेण्यात येत नाही, असे कोमासकर यांनी सांगितले.

हेही वाचा… डोंबिवली शहराच्या विविध भागात रात्रीच्या वेळेत अघोषित वीज भारनियमन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भरत पाटील यांनी सांगितले, खंबाळपाडा भागातील तलावात मासे मृत पडल्याच्या तक्रारी आल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी मृत माशांपासून दुर्गंधी रोखण्यासाठी त्या भागात जंतुनाशक फवारणी केली आहे.