डोंबिवली – पृथ्वीवरचे नंदनवन म्हणजे काश्मीर. तेथील सृष्टीसौंदर्य, बर्फाच्छादित डोंगर, घनदाट जंगल आणि थंडगार हवा. पर्यटनाच्या माध्यातून या सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी भागात राहणारे एक रहिवासी मानस सुरेश पिंगळे आपल्या कुटुंबीयांसह आठ दिवसांच्या दौऱ्यासाठी काश्मीर-पहलगाम येथे पर्यटनासाठी गेले होते. सोमवारी (ता.२१) पहलगाम भागातील बैसरन टेकड्या उर्फ मिनी स्वीत्झर्लंड भागाला पिंंगळे कुटुंबीयांनी भेट देऊन तेथे त्यांनी पर्यटनाचा सुखद अनुभव घेतला.
पहलगाम पासून घोड्यावरून अर्धा तासाच्या प्रवासाने पर्यटक उंचावरील बैसरन टेकड्या (हिल्स) भागात जातात. याठिकाणी वाहनाने जाण्याची सुविधा नाही. महाराष्ट्रातील महाबळेश्वर, माथेरानसारखे हे ठिकाण. बैसरन टेकड्यांना मिनी स्वीत्झर्लंड म्हणून ओळखले जाते. अफाट सृष्टीसौंदर्याने हा भूभाग डवरलेला आहे. टेकड्यांच्या माथ्यावर विस्तीर्ण मोकळे मैदान आहे. या मैदानावर हजारो देशी, विदेशी पर्यटक दररोज फिरण्यासाठी येतात. प्रचंड सुरक्षा व्यवस्था पहलगाम ते बैसरन टेकड्या भागात आहे, अशी माहिती डोंबिवलीतील पर्यटक आणि ब्राह्मण महासंघ डोंबिवलीचे माजी अध्यक्ष मानस पिंगळे यांनी दिली.
गोळीबाराच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी मानस पिंगळे कुटुंबीयांसह पहलगाम भागातील बैसरन टेकड्या भागात फिरून आले. शनिवारी रात्री जम्मू काश्मीर भागात ढगफुटी आणि भूस्खलन झाल्याने काही मार्ग बंद पडले होते. त्यामुळे मानस पिंगळे यांनी पहलगाम येथेच थांबून तेथून दुसऱ्या दिवशी वैष्णोव देवी येथे जाण्याचा निर्णय घेतला होता.
ढगफुटी आणि झालेल्या भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यावेळी काही स्थानिक व्यावसायिक, विक्रेते याठिकाणी आता काही गडबड होण्याची शक्यता आपसात चर्चा करताना व्यक्त करत होते. काश्मीर परिसरातील प्रचंड सुरक्षा व्यवस्था, सुरक्षा रक्षकांची प्रत्येकाच्या हालचालींवर करडी नजर, त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांमधील चर्चेला विशेष महत्व नव्हते. काश्मीर, पहलगाम मधील जागोजागीची सुरक्षा व्यवस्था पाहिल्यावर तेथे हल्ला किंवा दुर्घटना घडेल असे कधी मनात येत नाही. येथील पर्यटक पूर्णपणे सुरक्षेच्या कड्यात सुरक्षितपणे फिरत असतो, असे पिंगळे यांनी सांगितले.
एवढी सुरक्षा असताना आम्ही बैसरन टेकड्यांवर जाऊन आल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या जागेवर दहशतवाद्यांकडून हल्ला होतो. पर्यटकांना जीवे ठार मारले जाते. हे अनाकलनीय आहे. प्रत्येक पाॅईंटला तेथे विविध कॅडरचे सुरक्षा जवान तैनात होते. त्यामुळे घनदाट जंगल, बर्फाचे डोंगर किंवा दऱ्याखोऱ्यातून तेथे सुरक्षा व्यवस्थेची नजर चुकवून कोण आले हे काही समजण्यास वाव नाही. पर्यटक तेथे निसर्गसौंदर्यांचा आस्वाद घेत असताना कुटुंबीयांसमोर सदस्याला दहशतवाद्यांकडून ठार मारले जाते, हे अतिशय निंदनीय आहे, असे मानस पिंगळे यांनी सांगितले.
ढगफुटी, भूस्खलन आणि त्यानंतर पहलगाम बैसरन टेकड्यांवरील दहशतवादी हल्ला. या सगळ्या अस्वस्थ करणाऱ्या गोंधळलेल्या वातावरणामुळे आपण वैष्णोदेवीचा दौैरा रद्द करून श्रीनगर येथून डोंबिवली येथे परतणे पसंत केले. काश्मीरमध्ये असतानाच भयंकर हल्ल्याची घटना घडल्याने कोणतेही आव्हान न स्वीकारताना आपण कुटुंबीयांसह माघारी परतणे सोयीस्कर हाच विचार केला. काश्मीर नंदवनच आहे. प्रत्येक माणूस तेथे सुरक्षित आहे. पण हे का घडले….याचे खोलवर ठोस उत्तर शोधावेच लागेल, असे मानस पिंगळे सांगतात.