ठाणे : एका मुलीला जन्मताच कान नव्हता आणि कमी ऐकू येत होते. यामुळे काहीच करू शकत नाही, असे तिला कुटुंबियांकडून हिणवले जात होते. परंतु एका डाॅक्टरांच्या ओळखीतून तिने डाॅ. अशेष भुमकर यांची भेट घेतली आणि त्यांनी शस्त्रक्रिया करून तिला सजीव कान बसविला. यामुळे प्राप्त झालेल्या श्रवणशक्तीच्या जोरावर ती डाॅक्टर झाली. अशाप्रकारे देश आणि विदेशात आतापर्यंत एक हजारहून अधिक शस्त्रक्रिया डाॅ. भुमकर यांनी केल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे मिळालेल्या श्रवणशक्तीमुळे अनेकांना ध्येय गाठणे शक्य झाले आहे.

पुण्यातील एका दाम्पत्याच्या मुलीला जन्मत: कान नव्हता. शिवाय, तिला कानाने कमी ऐकू येत होते. यामुळे तिला घरात सापत्न वागणूक मिळत होती. आयुष्यात काहीच करू शकत नाही आणि हिचे पुढे काहीच होणार नाही, असे तिला घरातूनच हिणवले जात होते. परंतु तिला डाॅक्टर व्हायचे होते आणि हे ध्येय गाठण्यासाठी तिची धडपड सुरूच होती. तिने वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून अभ्यासही सुरू केला. कमी ऐकू येत होते. इतर विद्यार्थींचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि घरातून हिणवले जात असल्याने तिचा आत्मविश्वास कमी होत होता. तिने एका डाॅक्टरांना हा प्रकार सांगितला आणि त्यानंतर त्यांच्या ओळखीने तिने ठाण्यातील कान-नाक-घसा तज्ज्ञ डाॅ. अशेष भुमकर यांची भेट घेतली. डाॅ. भुमकर यांनी शस्त्रक्रिया करून तिला सजीव कान बसविला. यामुळे व्यवस्थित ऐकू येऊ लागले. कान नसल्यामुळे चेहरा कुरूप दिसत असल्याची भावना तिच्या मनात होती. पण, कान बसविण्यात आल्याने तिची मनातली ही भावनाही दूर झाली. त्याचबरोबर आत्मविश्वासही वाढला. या जोरावर तिने वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला. ती होमिओपॅथी डाॅक्टर असून ती पुण्यातील एका रुग्णालयात कार्यरत आहे.

हेही वाचा – डोंबिवली : अल्पवयीन दुचाकीस्वाराने दिली पादचाऱ्याला धडक, पादचारी जखमी

सजीव कान बसविण्याची शस्त्रक्रिया करणारे डाॅ. भूमकर हे देशातील एकमेव डॅाक्टर आहेत. त्यांनी सविस्तर अभ्यास करून या शस्त्रक्रियेचे तंत्र अवगत केले आहे. रुग्णाच्या बरगड्यातून काही भाग काढून त्या भागापासून हा कान तयार केला जातो. हा कान तयार झाल्यानंतर कानाच्या ठिकाणी तो बसविला जातो. १० वर्षांपुढील सर्वांमध्ये ही शस्त्रक्रिया करता येते, असे डाॅ. भुमकर यांनी सांगितले. शाळेत जाणाऱ्या मुलांना मोठ्या आवाजाची आवश्यकता नसते. त्यामुळे हा कान त्याच्यासाठी परिपूर्ण असतो. परंतु, महाविद्यालय किंवा नोकरीच्या ठिकाणी असताना त्याला मोठ्या आवाजाची आवश्यकता असते. त्याकरीता कान प्रत्यारोपणादरम्यान एक चीप बसवावी लागते. ती महाग असल्याने अनेकांना त्याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे अशा रुग्णांना शासनामार्फत मदत मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा – डोंबिवली पश्चिमेत रस्त्यावरील गॅरेजचा वाहतुकीला अडथळा; हातगाड्या, टपऱ्यांनी अडविले चौक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना आधी डाॅ. भूमकर यांनी कझाकिस्तान जाऊन काही मुलांवर ही शस्त्रक्रिया केली होती. या शस्त्रक्रियेनंतर तेथील मुलांना उत्तम ऐकता येत असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याचबरोबर दुबई तसेच इतर देशातही त्यांनी अशाप्रकारची शस्त्रक्रिया केली आहे. आता कझाकिस्तान येथून ठाण्यात आलेल्या आठ मुलांवर डाॅ. अशेष भुमकर हे शस्त्रक्रिया करून त्यांना सजीव कान बसविणार आहेत.