ठाणे : मुंबई महानगरातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणारा घोडबंदर मार्ग ठाणे महापालिका क्षेत्रातून जात असला तरी तो राज्य सरकारच्या प्राधिकरणांच्या अखत्यारीत येतो. या मार्गावर विविध प्राधिकरणांमार्फत कामे सुरू असून या कामांमुळे पावसाळ्यात घोडबंदर मार्गांवर पाणी साठू नये यासाठी पालिका प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संबंधित प्राधिकरणांशी संपर्क करून उपाययोजना सुचविण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने अभियंत्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
उरण येथील जेएनपीटी बंदर आणि गुजरात येथून होणारी अवजड वाहतूक घोडबंदर मार्गे होते. ठाणे महापालिका क्षेत्रात असलेले घोडबंदर परिसराचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. या नागरिकांची वाहने घोडबंदर मार्गेच वाहतूक करतात. यामुळे सतत वर्दळ असलेल्या घोडबंदर मार्गावर कोंडी होते. या मार्गावर गेल्या काही वर्षांपासून मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरू असून यामुळे रस्ता काही ठिकाणी अरुंद झाला आहे. त्यातच काही महिन्यांपुर्वी घोडबंदरचा मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी गटारांची बांधणी करण्यात येत असून त्याची कामे पुर्ण झालेली नाहीत. त्यातच काही ठिकाणी जूनी गटारे तोडण्यात आली आहेत. यामुळे मार्गावर पावसाचे पाणी साठण्याची भिती व्यक्त होत होती.
ठाणे महापालिका क्षेत्रातून घोडबंदर मार्ग जात असला तरी तो मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या प्राधिकरणांच्या अखत्यारीत येतो. परंतु दरवर्षी या मार्गावर पावसाळ्यात खड्डे पडतात आणि या मुद्द्यावरून पालिकेवर टिका होते. त्यामुळे यंदा घोडबंदर मार्गावर पाणी साठले तर त्यावरून पालिकेवर टिका होऊ शकते आणि नागरिकांचीही गैरसोय होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव हे सातत्याने सर्वच विभागांसोबत बैठका घेत आहेत. त्यापाठोपाठ संबंधित प्राधिकरणांशी संपर्क करून उपाययोजना सुचविण्यासाठी ठाणे महापालिकेने अभियंत्यांच्या नियुक्त्या केल्या असून या नियुक्तीचे आदेश ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी काढले आहेत. या कामात कोणतीही कसुर झाल्यास व्यक्तीश जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.
रस्त्याची जबाबदारी अभियंत्यांवर
कापुरबावडी ते पातलीपाडा उड्डाणपुलाच्या (दोन्ही बाजू) ३. ४० किमी अंतराच्या रस्त्याची जबाबदारी अभियंता दत्ता शिंदे, प्रशांत कलगुटकर यांच्याकडे देण्यात आली आहे. पातलीपाडा उड्डाणपुल ते ओवला नाका (दोन्ही बाजू) ३.५० किमी अंतर रस्त्याची जबाबदारी अभियंता किशोर गोळे, प्रवीण करडी तर, ओवळा नाका ते गायमुख (दोन्ही बाजू) ३ किमीच्या रस्त्याची जबाबदारी अभियंता विजय भोई, निशांत पवार आणि शशिकांत भोईर यांच्याकडे देण्यात आली आहे.