डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर येथील उल्हास खाडीवरील माणकोली उड्डाण पुलावर ‘धुरंदर’ या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण शनिवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत करण्यात येत असल्याने डोंबिवलीकडून माणकोली पुलाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पुलाजवळील स्वामी नारायण सिटी येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने सुरई चौक ते स्वामी नारायण सिटी आणि स्वामी नारायण सिटी ते सुरई चौक या एकाच मार्गिकेतून धावतील, अशी माहिती वाहतूक विभागाचे प्रभारी पोलीस उपायुक्त शरद ओहोळ यांनी दिली आहे.

शुक्रवारी सकाळी सहा वाजता या चित्रीकरणाला माणकोली उड्डाण पुलावर सुरूवात करण्यात आली आहे. हे चित्रीकरण शनिवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत माणकोली पुलावर वाहतूक कोंडी होऊ नये. चित्रीकरण बघण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचा वाहतुकीला अडथळा होऊ नये किंवा या रस्त्याने जाताना चित्रीकरण पाहण्यासाठी प्रवाशांनी थांबू नये म्हणून डोंबिवलीकडून भिवंडी, मुंबई नाशिक महामार्ग दिशेने माणकोली पुलावरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना स्वामी नारायण सिटी येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

डोंबिवलीतून जाणारी वाहने माणकोली पुलाजवळील स्वामी नारायण सिटी चौक ते सुरई गाव चौकपर्यंंत आणि भिवंडीकडून सुरई चौक, स्वामी नारायण चौकाकडे या मार्गिकेवरून धावतील, असे वाहतूक विभागाने सुचवले आहे. एस. आर. ब्रदर्स लोकशन या कंपनीतर्फे माणकोली उड्डाण पुलावर ‘धुरंदर’ या चित्रपटाचे चित्रीकरण शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून सुरू करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चित्रीकरण सुरू राहणार आहे. या चित्रीकरणाच्या कालावधीत माणकोली पूल भागात कोणत्याही प्रकारची कोंडी होऊ नये म्हणून हा वाहतूक मार्ग बदल करण्यात आला आहे, असे प्रभारी पोलीस उपायुक्त शरद ओहोळ यांनी वाहतूक अधिसूचनेत म्हटले आहे.अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, गॅस वाहिका, पोलीस वाहने, अग्निशमन वाहनांना या कालावधीत प्रवेश असणार आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून माणकोली पुलावर चित्रीकरणासाठी शामियाना उभारण्याची कामे सुरू करण्यात आली होती. माणकोली पुलावर चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असल्याचे आणि तेथे अभिनेते आले असल्याची माहिती समजल्यावर डोंबिवली, भिवंडी शहर, ग्रामीण परिसरातील चित्रपटप्रेमी नागरिकांनी पुलाच्या परिसरात गर्दी केली होती. या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून डोंबिवली, भिवंडी पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजुने विशेष खबरदारी घेतली होती.