भिवंडीतील पूर्णा भागात बुधवारी सकाळी सातच्या सुमारास खाद्य तेल आणि औषधांचा साठा असलेल्या तीन ते चार गाळ्यांना अचानक आग लागली होती. या आगीत गाळ्यांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुमारे पाच तासानंतर अग्निशमन दलाला ही आग विझविण्यात यश आले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊन शकले नाही.

हेही वाचा >>> अनंत करमुसे यांनी तपासात सहकार्य केले नाही ; दोषारोप पत्रात पोलिसांचा ठपका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भिवंडी येथील पूर्णा भागात अरिहंत कंपाऊंड आहे. या अरिहंत कंपाऊंडमधील मे. मायक्रो लॉजिस्टिक्स या कंपनीचे खाद्य तेलाचा आणि औषधांचा साठा करून ठेवलेले काही गाळे आहेत. यातील तीन ते चार गाळ्यांना बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आग मोठया प्रमाणात पसरू लागल्याने स्थानिकांनी लागलीच अग्निशमन दलाला पाचारण केले. आग मोठया प्रमाणात लागली असल्याने ती विझविण्यासाठी भिवंडी आणि कल्याण येथील अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तसेच ठाणे अग्निशमन दलाचा पाण्याचा एक टँकर तसेच दोन खासगी पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. या सर्वांच्या तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझविण्यात यश आले. या आगीत गाळ्यांचे मोठे नुकसान झाले. तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ठ झाले नसून तपास सुरु आहे.