कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात उल्हासनगर येथील घनश्याम भतिजा खून खटल्यातील आरोपी पप्पू कलानीचा खटला, तसेच उंबर्डे येथील एका हॉटेल मालकाच्या खुनाचा खटला चालविणारे विशेष सरकारी वकील विकास पाटील-शिरगावकर यांना सोमवारी सकाळी त्यांच्या भ्रमणध्वनीवर पाकिस्तानातून धमकीचा भ्रमणध्वनी आल्याने खळबळ उडाली आहे.
विकास पाटील-शिरगावकर हे सातारा येथे राहतात. कल्याण न्यायालयात आज सकाळी उंबर्डे येथील विनोद पाटील खून खटल्याच्या कामासाठी ते आले होते. त्या वेळी अॅड. पाटील यांना सकाळी दहा वाजता +९२३०७७००८२९९ या भ्रमणध्वनीवरून (नेट कॉल) धमकी देण्यात आली. पाटील यांनी तात्काळ हालचाल करून पोलिसांच्या साहाय्याने भ्रमणध्वनी कोठून करण्यात आला याचा शोध घेतला. हा भ्रमणध्वनी पाकिस्तानातून आला असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.
संरक्षणाची मागणी
अॅड. विकास पाटील यांनी तातडीने मुख्यमंत्री, ठाणे पोलीस आयुक्त यांना एक निवेदन देऊन, आपणा समोर सध्या पप्पू कलानी आरोपी असलेल्या घनश्याम भतिजा खून खटल्याची सुनावणी कल्याण न्यायालयात सुरू आहे. याशिवाय उंबर्डे येथील विनोद पाटील यांच्या खून प्रकरणाचा खटला आपण सरकार पक्षातर्फे चालवीत आहोत. या कामासाठी आपणास नियमित कल्याण येथे यावे लागणार आहे. त्यामुळे आपणास तातडीने केवळ ठाणे जिल्ह्य़ापुरते पोलीस संरक्षण न देता, ते ठाणे जिल्हा ते सातारापर्यंतच्या प्रवासासाठी देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
पप्पू कलानी आरोपी असलेला एक खून खटला न्यायप्रविष्ट असताना आपणावर सात वर्षांपूर्वी शिरवळ (सातारा) येथे हल्ला झाला होता. ते प्रकरण अद्याप गुलदस्त्यात आहे. हा अनुभवही पाटील यांनी निवेदनात नमूद केला आहे.