कल्याण – दडी मारलेल्या पावसाने मागील दोन दिवसांपासून हजेरी लावली आहे. एक ते दोन तासाच्या अंतराने पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. त्यामुळे सखल भागात, रस्ते कामे असलेल्या भागात पाणी तुंबण्याचे प्रकार होत आहेत. या पावसाने उकाड्याने हैराण झालेले नागरिक समाधानी झाले आहेत.

पावसामुळे हवेत गारवा आला आहे. दोन दिवसांपासून विजांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. काळ्या ढगांनी आकाश व्यापले आहे. रविवारपासून एक ते दोन तासाच्या अंतराने पावसाची मुसळधार येते. एक तास हा पाऊस कोसळतो. त्यामुळे सखल भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. शाळा सुरू झाल्या आहेत. पालक, विदयार्थ्यांना शाळेत जाताना, शाळा सुटल्यावर घरी निघताना पाऊस विद्यार्थी, पालकांना ओलेचिंब करत आहे. मुसळधार पाऊस कोसळायला सुरूवात झाल्यानंतर सखल भागातील पाणी अनेक इमारतींच्या वाहनतळाच्या जागेत घुसत आहे. काही चाळींमध्ये गटाराचे पाणी शिरण्याचे प्रकार होत आहेत.

गेल्या आठवड्यात पाऊस सुरू झाल्यानंतर त्यानंतर पावसाने दडी मारली. पुन्हा वैशाखासारखा उकाडा सुरू झाला होता. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत नागरिक होते. शनिवारपासून पु्न्हा पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाने सखल भागात पाणी तुंबत असल्याने रिक्षा चालक, दुचाकी, मोटार स्वारांचे सर्वाधिक हाल होत आहेत. वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी शिरून वाहने बंद पडण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे अनेक रिक्षा चालक मुसळधार पाऊस सुरू झाला की आपली वाहने बंद ठेवणे पसंत करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिक्षा वाहनतळावर आल्या नाही की प्रवाशांचे हाल होत आहेत. पालिका हद्दीत कोठेही पाणी तुंबण्याचे प्रकार घडणार नाहीत यासाठी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आपत्ती निवारण विभाग, प्रभाग साहाय्यक आयुक्तांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर कोणतीही आपत्ती ओढावली तर वेळीच सर्व प्रकारची साधनसामग्री पोहचली पाहिजे. या कामात कोठेही हलगर्जीपणा होता कामा नये यासाठी उपायुक्त दर्जाचा एक अधिकारी रात्रीच्या वेळेत आपत्ती निवारण कक्षात नियुक्त करण्यात आला आहे. कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील अनेक शेतकरी भात शेती करतात. डोंबिवली जवळी खंबाळपाडा, कचोरे, २७ गाव हद्दीत भात पेरणी आणि शेताची उखळणी करण्याची कामे सुरू आहेत.