ठाणे : राज्यात शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला पुकारण्यात आलेल्या मोर्चात उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच, राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) शरद पवार यांनीही या मोर्चास पाठिंबा दिला आहे. त्यानंतर ठाण्याजवळील कळवा शहरात राज, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे एकत्र छायाचित्र असलेले फलक झळकले आहेत. ‘मराठीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, आता आवाज उठवायचा’ ‘एकच ध्यास, मराठीचा श्वास’ असा आशय यात लिहीण्यात आला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जुलैला मोर्चाची हाक दिली होती. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनीही मराठी समन्वय समितीच्या ७ जुलैच्या मोर्चास पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याशी दूरद्धनीद्वारे संवाद साधत मराठी माणसाची एकजूट दिसून येईल असा प्रस्ताव ठेवला. उद्धव ठाकरे हे देखील यास तयार झाले आहेत. त्यामुळे ५ जुलैला सकाळी मनसे आणि ठाकरे गटाचा एकत्र मोर्चा निघणार असल्याचे निश्चित झाले असून या मोर्चास काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले.

या मोर्चास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सहभाग घेतल्यास दोन्ही ठाकरे बंधू तब्बल १८ वर्षानंतर एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. त्यामुळे या मोर्चाकडे सर्वच माध्यमांचे लक्ष लागले आहे. यात आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिल्याने त्यांचे कार्यकर्तेही कामाला लागले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कळवा येथे शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी फलक उभारले आहेत. त्यामध्ये ‘चला मुंबईत’ असे म्हटले आहे. तसेच फलकावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे छायाचित्र लागले आहेत. ‘मराठीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, आता आवाज उठवायचा’ ‘एकच ध्यास, मराठीचा श्वास’ असे देखील यात म्हटले आहे. हे फलक आता ठाणेकरांचे लक्ष वेधत आहेत.