कल्याण – मुंब्रा-पनवेल महामार्गावर शिळफाटा रस्त्यावरील कल्याण फाट्याजवळ कमानी उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलामुळे वाहतूक कोंडीमुक्त रस्ता होण्याऐवजी पुलाखालील भागात दररोज सकाळ, संध्याकाळ सर्व प्रकारची वाहने अडकून पडलेली असतात. या सततच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण आहेत. सकाळच्या वेळेत आणि संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसतो. मालवाहतूक करणारी अवजड वाहने, लांब पल्ल्याच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस या कोंडीत अडकून पडतात. दररोज ही कोंडी होत असते. या कोंडीमुळे स्थानिक व्यापारी हैराण आहेत.
शिळफाटा रस्त्यावरील कल्याण फाट्याजवळ जुन्या दत्त मंदिर भागात मुंब्रा पनवेल रस्त्यावर वाहतुक कोंडी टाळण्यासाठी कमानी पुलाची उभारणी करण्यात आली आहे. या पुलामुळे पनवेल, ठाणे, मुंब्राकडून येणारी वाहने थेट रस्ते मार्गातील चौकातून न जाता थेट पुलावरून निघून जातील असे नियोजन आहे. या पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. दुसरी मार्गिका खुली करण्यात आलेली नाही. त्यामुळे बहुतांशी वाहने पुलालगतच्या आणि पुलाखालील रस्ते मार्गाने इच्छित स्थळी जातात.
शिळफाटा चौकातील कल्याण फाटा येथे वाहतूक पोलिसांनी ठाणे, पनवेलकडून येणारी वाहने इतर मार्गिकांमधील वाहने जाण्यासाठी रोखून धरली की मुंब्रा दिशेने कमानी पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. या वाहनांच्या रांगांमुळे कमानी पुलाखालील बाजू इतर वाहनांसाठी बंदिस्त होऊन जाते. त्याचवेळी नवी मुंबई परिसरातून येणारी बस, अवजड, जड वाहने कमानी पुलाखालून कल्याण फाट्याकडे जाण्यासाठी येतात, त्यावेळी ती अगोदरच्याच थोपवून धरलेल्या वाहनांमुळे पुलाखाली आणि त्या पाठोपाठ अडकून पडतात. नवी मुंबईकडून येणारी वाहने कोंडीत अडकल्यावर पनवेलकडून ठाणे, नवी मुंबई दिशेने जाण्यासाठी येणाऱ्या मार्गिकेतील वाहने कमानी पुलाजवळ नवी मुंबईकडून येणाऱ्या वाहनांमुळे अडकून पडतात.
कमानी पुलाखालील दोन्ही दिशांची वाहने अडकून पडली की या वाहनांंमधून मार्ग काढण्यासाठी स्थानिक रहिवासी, व्यापारी आपल्या मोटारी, दुचाकी मध्ये घुसवून कोंडीतून मार्ग काढत पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. या हलक्या वाहनांमुळे कोंडीत आणखी भर पडते. या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात नसल्याने प्रवासी या वाहतूक कोंडीत अर्धा ते एक तास अडकून पडतात. हा दररोजचा अनुभव असल्याचे नवी मुंबईकडून येणाऱ्या प्रवाशांनी सांगितले.
ही कोंडी निर्माण झाल्यानंतर एखाद्या वाहन चालकाने वाहनातून उतरून कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला तर स्थानिक रहिवासी आणि वाहन चालक त्या चालकाला दादागिरी करून तेथून हाकलून लावतात. कमानी पुलाच्या आजुबाजुला अधिक प्रमाणात गृहसंकुले झाली आहेत. या भागातील मुले शाळेसाठी ठाणे, कळवा, मुंब्रा भागात जाणारी आहेत. येत्या पंधरा दिवसांनी शाळा सुरू झाल्यानंतर त्यांना या कोंडीचा फटका बसणार आहे. त्यामुळे ही कोंडी सोडविण्यासाठी कमानी पुलावर रखडलेली कामे लवकर पूर्ण करून कमानी पूल पूर्ण क्षमतेने दोन्ही मार्गिकांमधून सुरू करण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.