ठाणे : बाळकुम येथील मुंबई महापालिकेच्या जलवाहिनी लगत खारफुटीवर भराव टाकून खारफुटी नष्ट केल्याप्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळकूम येथील जलवाहिनी लगत माती आणि राडारोड्याचा भराव टाकून खारफुटी नष्ट केली होती. याबाबत पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना माहिती मिळाल्यानंतर तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा : ठाणे: गणेशोत्सवात दिवसा अवजड वाहनांना निर्बंध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तक्रारीनंतर कांदळवन संरक्षण व संवर्धन सनियंत्रण उपसमितीने ६ जूनला स्थळ पाहाणी केली. त्यावेळी सर्व्हे क्रमांक ३८ आणि ५९ येथील खारफुटींवर मोठ्याप्रमाणात भराव टाकून ती नष्ट केल्याचे आढळून आले. अखेर मंडळ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरोधात पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ आणि १९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.