ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदार संघासाठी एकूण ३५५ अर्जाचे वितरण करण्यात आले होते. यापैकी नामनिर्देशन अर्ज छाननी प्रक्रियेत २० अर्ज अवैध ठरल्याने ९१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यात सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशी १२ जणांनी नामनिर्देशन अर्ज माघार घेतल्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात ८४ उमेदवार एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत.

ठाणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदार संघासाठी २६ एप्रिलपासून नामनिर्देश अर्ज दाखल व वितरीत करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ३ मे अंतिम तारीख होती. या कालावधीत जिल्ह्यात ३५५ नामनिर्देशन अर्ज वितरीत करण्यात आले. त्यापैकी १११ उमेदवारांनी १३६ नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. यामध्ये काही उमेदवारांकडून दोन तर, काही उमेदवारांनी चारचार अर्ज दाखल केले. शनिवारी अर्ज छाननी प्रक्रियेत २० अर्ज अवैध तर, ९१ अर्ज वैध ठरले होते.

हेही वाचा : भिवंडीतून निलेश सांबरे यांचा अर्ज बाद , तरीही महाविकास आघाडीची डोकेदुखी कायम कशामुळे?…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामध्ये ठाणे लोकसभा मतदार संघात ठाणे लोकसभेसाठी अर्ज छाननी प्रक्रियेत ३६ पैकी सर्वाधिक ११ अर्ज अवैध ठरल्याने २५ अर्ज वैध ठरले आहे. त्यात सोमवारी अर्ज माघारीच्या एका अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात २४ उमेदवार उभे ठाकले आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात शनिवारी अर्ज छाननी प्रक्रियेत ३४ पैकी ४ अर्ज अवैध ठरल्याने ३० अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्यामुळे २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भिवंडी लोकसभा मतदार संघात अर्ज छाननी प्रक्रियेत ४१ पैकी ५ अर्ज अवैध ठरल्याने ३६ अर्ज वैध ठरले होते. त्यात सोमवारी अर्ज माघारीच्या ९ उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्यामुळे ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.