कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या १४ शाळांमध्ये सामाजिक दायित्व निधीमधून ५० किलोवॅट क्षमतेचे सौर उर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यात आले आहेत. विविध सामाजिक संस्थांनी या प्रकल्पांसाठी सुमारे २५ लाखाचे आर्थिक योगदान दिले आहे. उर्वरित १६ शाळांमध्ये सौर उर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्याची जबाबदारी एमसीएचआयच्या कल्याण शाखेने उचलली आहे.
शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना अपारंपारिक उर्जा स्त्रोतांची माहिती व्हावी. सौर उर्जा निर्मितीचे, वीज बचतीचे फायदे कळावेत हाही हे प्रकल्प शाळेमध्ये बसविण्या मागील मुख्य उद्देश आहे, अशी माहिती या सौर उर्जा प्रकल्पांचे समन्वयक विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली. पालिका शाळांमधील १४ सौर उर्जा प्रकल्पांचे उद्घाटन आयुक्त अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी, उपायुक्त संजय जाधव, उपायुक्त रमेश मिसाळ, एमसीएचआयचे सचिव मिलिंद चव्हाण, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, शिक्षणाधिकारी विजय सरकटे उपस्थित होते.
लहान सौर उर्जा प्रकल्प हे मोठ्या सौर उर्जा प्रकल्पांइतकेत महत्वाचे आहेत. त्यामुळे असे प्रकल्प बसविण्यासाठी प्रत्येक संस्था, सामाजिक संस्था, आस्थापना यांनीही पुढाकार घेतला पाहिजे. अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी असे स्थानिक पातळीवरील सौर उर्जा प्रकल्प खूप महत्वाचे आहेत, असे आयुक्त गोयल यांनी सांगितले.
केंद्र, राज्य सरकारच्या पुढाकारातून सौर उर्जा निर्मिती घराघरात पोहचेल यादृष्टीने शासन पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. पारंपारिक उर्जा स्त्रोतांची उपलब्धता पाहता सौर उर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारने एक लक्ष्य निर्धारित केले आहे, देशाचा प्रत्येक परिसर जोपर्यंत या उपक्रमात सहभागी होत नाही, तोपर्यंत सरकारला आपले लक्ष्य गाठणे शक्य होणार नाही. त्यामुळे प्रत्येक संस्थेने अशा प्रकल्पांसाठी खारीचा वाटा उचलला पाहिजे, असे आयुक्तांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या १४ शाळांमध्ये हे प्रकल्प उभारणीसाठी रिजन्सी ग्रुप, वैष्णवी बिल्डकाॅन, कल्याण रनर्स ग्रुप, रोटरी क्लब न्यू कल्याण, मोहन खेडा ग्रुप, स्वामी नारायण लाईफ स्पेस, थारवानी इन्फ्रा, बिर्ला वन्या, वेस्ट पायोनिअर या बांधकाम संस्थांसह, मे. एस. एस. इलेक्ट्रिक्ल वर्कस, त्रिमूर्ती एन्टरप्रायझेस, टाॅप इलेक्ट्रिकल, नेहल प्राॅपर्टी, राॅयल इलेक्ट्रिकल, आशीर्वाद इलेक्ट्रिकल, मल्हार, तुषार इलेक्ट्रिकल, कल्याण इव्हेन्टस, के. बी. इलेक्ट्रिकल कंपन्यांनी आर्थिक योगदान दिले आहे.
अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा प्रभावी वापर व्हावा. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना सौर उर्जेचे, पारंपारिक वीज बचतीचे महत्व कळावे. हा हे प्रकल्प पालिका शाळेत राबविण्यामागील मुख्य उद्देश आहे. अनेक सामाजिक, वाणिज्य संस्थांनी या प्रकल्पाच्या उभारणीसाठी हातभार लावला. पालिकेच्या इतर शाळांमध्ये लवकरच हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यासाठी एमसीएचआयच्या कल्याण शाखेने पुढाकार घेतला आहे. – प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग.