कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करणाऱ्या गणेश भक्तांचा कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, शहर अभियंता अनिता परदेशी यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला जात आहे. गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गणेश भक्तांनी नदी, खाडी, ओहोळ असे नैसर्गिक जलस्त्रोत प्रदुषित करू नयेत. अधिकाधिक भाविकांनी पालिकेने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करावे, हा या उपक्रमा मागील मुख्य उद्देश आहे.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील विविध भागात एकूण ६३ कृत्रिम तलाव पालिकेने निर्माण केले आहेत. भाविकांना आपल्या घर परिसरात गणपती विसर्जन करण्याची संधी मिळावी. प्रत्येक भाविकाला दोन ते तीन किलोमीटर अंतर वाहन, पायी चालत जाऊन गणपती विसर्जन करण्यास लागू नये. वाहन कोंडीचा कोणालाही त्रास होऊ नये. तसेच जलप्रदुषण होऊ नये, नैसर्गिक जलस्त्रोत स्वच्छ रहावेत हा या उपक्रमा मागील मुख्य उद्देश आहे, असे पालिका आयुक्तांनी सांगितले.

हेही वाचा : कल्याणमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा

विसर्जन आपल्या दारी या शीर्षकाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. कृत्रिम तलावांमध्ये एक निर्माल्य कलश ठेवण्यात आला आहे. तेथे भाविकांना निर्माल्य टाकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निर्माल्यापासून खत तयार करून ते पालिकेचे बगिचे, उद्यानांमधील झाडांंसाठी वापरण्यात येते. गेल्या काही वर्षापासून गणेश भक्त घराजवळील कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जनाला प्राधान्य देत आहेत. भाविक शाडूच्या मूर्तींचा अधिक प्रमाणात वापर करत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी अधिकाधिक पुढाकार घ्यावा, हाही या उपक्रमा मागील उद्देश आहे, असे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले.

हेही वाचा : कल्याणमध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्या वाहन मालकांवर कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणपती विसर्जन काळात कोळी बांधवांकडून पालिकेला मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आयुक्त डाॅ. जाखड यांनी कोळी बांधवांचे कौतुक केले. यावेळी आयुक्तांचा कोळी बांधवांची टोपी आणि शाल देऊन कोळी बांधवांतर्फे सन्मान करण्यात आला.