ठाणे : कल्याण तालुक्यातील निलिंबी गावाच्या हद्दीमध्ये सुमारे महिन्याभरापूर्वी फैजल अन्सारी (२९) यांचे शीर धडापासून वेगळे केलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या प्रकरणात फैजल याचा सावत्र भाऊ सलमान अन्सारी (२५) याला अटक केली आहे. संपत्तीच्या वादातून त्याने ही हत्या केल्याची कबूली पोलिसांना दिली. त्यामुळे संपत्तीच्या लालसेमुळे व्यक्ती किती टोकाला जाऊ शकतो हे या प्रकरणातून स्पष्ट होत आहे.
निलिंबी ते अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरील जंगलामध्ये २९ मे या दिवशी एक मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला होता. या मृतदेहाचे शीर हे धडापासून वेगळे झाले होते. याप्रकरणी पोलीस पाटील संगीता शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डाॅ. डी.एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी पथके तयार केली.
मृताची ओळख पटली नसल्याने पोलिसांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यातील हरविलेल्या व्यक्तींबाबत तक्रार दाखल आहे का, याची माहिती घेतली. तसेच मृताचे छायाचित्र विविध व्हाॅट्सॲप समूह, गाव-पाड्यात फलक चिटकवून माहिती मिळविण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे देखील आरोपीचा शोध सुरु केला. सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये पथकाला एक मोटार त्या भागातील रस्त्यावर आढळून आली होती.
पोलिसांनी मोटार मालकाची माहिती घेतली असता, ती सलमान अन्सारी नावाच्या व्यक्तीची असल्याचे पोलिसांना समजले. तो टिटवाळा येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, मृत व्यक्ती त्याचा सावत्र भाऊ असल्याची कबूली त्याने दिली. तसेच संपत्ती आणि वारंवार होणाऱ्या वादातून त्याने ही हत्या केल्याची कबूली दिली.
पोलीस अधीक्षक डाॅ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक भरत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, साहाय्यक फौजदार धनाजी कडव, पोलीस हवालदार प्रकाश साईल, संतोष सुर्वे, सतीष कोळी, हेमंत विभुते, भगवान सोनावणे, जितेंद्र वारके, शशिकांत पाटील, योगेश शेळकंदे, पोलीस शिपाई स्वप्नील बोडके तसेच सायबर गुन्हे शोध विभागाचे पोलीस हवालदार दिपक गायकवाड, रविंद्र मोरे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.