ठाणे: शहरात अलीकडेच बांधण्यात आलेल्या तुळजाभवानी मंदिरात पावसाच्या पहिल्याच सरीने गळती होऊ लागल्याचे दिसून येत आहे. अत्याधुनिक स्वरूपात उभारण्यात आलेल्या या मंदिराच्या गाभाऱ्यातच पावसाचे पाणी गळत असल्याचे चित्र दिसत आहे. मंदिराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून काही महिन्यांपूर्वीच ते भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. मात्र मंदिरात गळती होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

देशातील ५१ शक्तीपीठांपैकी आणि राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पुर्ण शक्तीपीठ म्हणून तुळजापुरचे तुळजाभवानी मंदीर ओळखले जात असून या शक्तीपीठाचे एक रुप ठाण्यात साकारण्यात आले आहे. ठाण्यातील पाचपाखाडी भागात प्रति तुळजापुर मंदीराची उभारणी मार्च महिन्यात करण्यात आली. काळ्या पाषाणात हे मंदिर उभारण्यात येत आले आहे. तसेच ३० एप्रिलला मंदीरातील तुळजाभवानी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते करण्यात आले होती. यावेळी विविध पक्षाचे राजकीय नेते देखील उपस्थित होते.

काही महिन्यांपूर्वीच हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. मंदिर भाविकांसाठी खुले झाल्यानंतर दररोज हजारो भक्त दर्शनासाठी येत आहेत. तसेच मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांकरिता ध्यानधारणेसाठीही येथे बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, पहिल्याच पावसात मंदिराच्या भिंती आणि छतांतून गळती होऊ लागल्याने भाविकांची गैरसोय झाली आहे. गाभाऱ्यातच पावसाचे पाणी साचत असल्यामुळे ध्यानधारणेसाठी बसणे अशक्य झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या मंदिर प्रशासनाने तात्पुरता उपाय म्हणून गळतीच्या ठिकाणी प्लास्टिकच्या बादल्या ठेवून पाणी अडवण्याचा प्रयत्न केला आहे. हे मंदिर काळ्या पाषाणात बांधले असले तरी अवघ्या दोन महिन्यांतच गळती सुरू झाल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.