बदलापूरः कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या महत्वाच्या माळशेज घाटात पावसामुळे दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतुकीवर काही अंशी परिणाम झाला आहे. घाटातील एक मार्गिका आता सुरू करण्यात आली आहे. तर दरड हटवण्याचे काम सुरू असून लवकरच सर्वच मार्ग खुला होईल, अशी माहिती तहसिलदार कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दरड कोसळण्याच्या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाले नसल्याचेही समोर आले आहे.

पुणे, अहिल्यानगर यांच्यासह मुंबई, ठाणे, नाशिक जिल्ह्यांसाठी महत्वाचा असलेल्या कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर माळशेज घाट महत्वाचा आहे. माळशेज घाटाच्या मार्गाने दूध, शेतमाल आणि इतर वाहतूक होत असते. प्रवासी वाहतुकीसाठीही हा महामार्ग महत्वाचा आहे. याच मार्गामुळे ठाणे, अहिल्यानगर आणि दोन्ही जिल्ह्यांतील बाजारपेठा जोडल्या जातात.

पावसाळ्यात हा मार्ग धोकादायक बनत असतो. पावसामुळे या माळशेज घाटात अनेकदा दरड कोसळण्याच्या घटना घडतात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सातत्याने यावर उपययोजना करत असते. त्यामुळे गेल्या काही वर्षात या घटना कमी झाल्या आहेत. मात्र तरीही अधून मधून येथे दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. गुरूवारी सकाळी माळशेज घाटात दरड कोसळण्याची घटना समोर आली. दरड कोसळण्याची नक्की वेळ कळू शकली नसली तरी भले मोठे दगड थेट घाटातील रस्त्यावर येऊन पडले. त्यामुळे रस्त्याचा मोठा भाग व्यापला गेला. याची माहिती मिळताच महामार्गा प्राधिकरण आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने येथे दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. दुपारी १ वाजेपर्यंत या घाटातील अहिल्यानगरकडे जाणारी एक मार्गिका सुरू करण्यात आली होती. तर इतरही मार्गावरील दरड हटवली जात असल्याची माहिती मुरबाडचे तहसिलदार अभिजीत देशमुख यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या तरी येथे पाऊस थांबलेला असून दरड हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. रस्त्याचा मोठा भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीचा अडथळा नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे माळशेज घाटातील वाहतूक सुरू आहे.