डोंबिवली शहराच्या दोन वेगळ्या भागात दोन घटनांमध्ये दुचाकी वरुन आलेल्या दोन जणांनी मोठ्या चलाखीने पादचाऱ्यांच्या गळ्यातील सुमारे दोन लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. एक घटना ठाकुर्लीतील ९० फुटी रस्ता तर दुसरी घटना मानपाडा रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी रामनगर, टिळकनगर पोलीस ठाण्यात दोन्ही व्यक्तिंनी तक्रार केल्या आहेत.

रामनगर पोलिसांनी सांगितले, ठाकुर्लीतील श्री गणेश सोसायटीतील मंगल कलश संकुलात राहणारे सेवानिवृत्त संकरलिंगम अरुणाचलम हे दररोज सकाळी सात वाजता ठाकुर्ली ९० फुटी रस्ता भागात चालण्यासाठी जातात. त्यांच्या गळ्यात दोन लाख १० रुपये किमतीची सोन्याची साखळी असते. बुधवारी सकाळी अरुणाचलम नेहमीप्रमाणे ९० फुटी रस्त्यावरुन चालत असताना एकवीरा चिकन सेंटर जवळ एक काळ्या रंगाची दुचाकी वेगाने त्यांच्या दिशेने आली. या दुचाकीवर दोन जण बसले होते. दुचाकी अंगावर आली म्हणून अरुणाचलम बाजुला झाले. तेवढ्यात काही कळण्याच्या आता दुचाकीवर मागे बसलेल्या इसमाने अरुणाचलम यांच्या मानेवर जोराने थाप मारुन त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली. वेगाने ते म्हसोबा चौकाच्या दिशेने पळून गेले. अरुणाचलम यांनी चोर म्हणून ओरडा केला. तोपर्यंत भुरटे चोर गायब झाले होते.

हेही वाचा >>> ठाण्यात आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून नव्या अधिकाऱ्यांची मोट बांधणी; उपायुक्त जोशी यांच्याकडून घनकचरा विभागाचा पदभार काढला

दुसरी घटना मानपाडा रस्त्यावरील आशीर्वाद रुग्णालयाच्या बाजुवरील रस्त्यावर घडली आहे. टिळकनगर पोलिसांनी सांगितले, अनिल कुंदर हे मानपाडा रस्त्यावरील श्री कॉम्पलेक्स मध्ये राहतात. अनिल हे बुधवारी सकाळी सात वाजता मुलाला शाळेत सोडण्यासाठी घरासमोर येणाऱ्या होली एन्जल शाळेच्या बससाठी गेले होते. मुलाला बसमध्ये बसून दिल्यानंतर अनिल आणि इतर पालक रस्त्यावर बोलत उभे असताना, दोन इसम दुचाकीवर बसून तेथून जात होते. त्यांनी अचानक दुचाकीला फिरकी मारुन दुचाकी अनिल यांच्या अंगावर आणली. अनिल यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पळून गेले. अनिल यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुचाकीवरील भामट्यांनी गेल्या काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवलीत चोऱ्यांचा धुमाकूळ घातल आहे. या चोरांना पकडण्यासाठी पोलीस उपायुक्तांचे विशेष तपास पथक, स्थानिक पोलीस ठाण्याची विशेष पथके कार्यरत असताना भुरटे चोर दाद देत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.