ठाणे : दिवा येथील पाणी तसेच इतर समस्यांबाबत सातत्याने आंदोलने होत असतानाच, मनसे आमदार प्रमोद पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांची गुरुवारी दुपारी भेट घेऊन त्यांच्यापुढे दिवावासियांच्या व्यथा मांडल्या. पाणी टंचाईची समस्या सोडविण्याबरोबरच शिळफाटा व कल्याण फाटा मार्गालगत सार्वजनिक शौचालयाच्या उभारणीसाठी तसेच खिडकाळी स्मशानभूमी ते उत्तरशिव पर्यंत रस्ता तयार करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली. तसेच दिवा रेलवे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. पालिकेकडून केवळ मोठमोठ्या प्रकल्पांची घोषणा केली जाते पण, त्यासाठी त्यांच्याकडे निधीच उपलब्ध नसल्याचा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
दिव्यात पाणी टंचाईची समस्या गेल्या महिन्यांपासून जाणवत आहे. या मुद्द्यावरून भाजपकडून आंदोलने करण्यात आली होती. तसेच दिव्यातील समस्या दूर करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महिनाभरापुर्वी आयुक्तांची भेट घेतली होती. त्यावेळेस समस्या सोडविण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र येथील समस्या सुटू शकलेल्या नाहीत. असे असतानाच मनसे आमदार प्रमोद पाटील यांनी गुरुवारी दुपारी आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांची भेट घेऊन दिवावासियांच्या व्यथा मांडल्या. आयुक्त शर्मा आणि आमदार पाटील यांच्यात दोन तास चर्चा सुरु होती. त्यावेळेस पालिकेतील सर्वच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांच्याकडून पाटील यांनी दिव्यात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीत पाणी टंचाई समस्या सोडविणे, पाणी पुरवठा पुर्ननियोजनाची संथगतीने सुरू असलेली कामांची गती वाढविणे, दिवा स्थानक परिसरात तिकीट खिडकी उभारण्यासाठी परिसरातील जागा मोकळी करून देणे, अशी मागणी त्यांनी बैठकीत केली.
शिळफाटा व कल्याणफाटा हे महत्वाचे चौक असून येथून महापे, वाशी, दिवा, पनवेल, ठाणे, मुंबईच्या दिशेने वाहनांची वाहतूक सुरु असते. या ठिकाणी बसथांबा, रिक्षा थांबा असल्यामुळे हा वर्दळीचा परिसर आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत आहे. असे असतानाही या परिसरात महापालिकेचे शौचालय नाही. त्यामुळे येथून प्रवास करणारे प्रवासी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांची गैरसोय होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक शौचालयाच्या उभारणीसाठी निधी देण्याची मागणीही त्यांनी केली. दिवा येथील प्रभाग क्र. २९ मधील रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. हा रस्ता कल्याण शिळ रस्ता आणि १४ गावांना जोडणारा असल्याने परिसरातील दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरुपी सुटेल. त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी निधी देण्याची मागणीही त्यांनी केली.
दिवा स्थानकामध्ये रेल्वे अपघातात दोन जणांचा मृत्यु झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. दिवा रेल्वे हद्दीत दर महिना १५ ते २० जणांचे बळी जातात. या अपघातांना सर्वात मोठे कारण येथील रस्त्यावर दोन्ही बाजूला बसणारे फेरीवाले आहेत. त्यांनी दोन्ही बाजूचा रस्ता पूर्णपणे व्यापलेला आहे. त्यातच रिक्षा व इतर वाहने असल्यामुळे प्रवाशांना पाय ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रवासी पर्याय शोधत धाई धाईत रेल्वे स्थानक गाठण्याचा प्रयत्न करतात आणि अपघात होऊन जीव गमावण्याची वेळ येते. उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे रेल्वे स्थानकापासून १५० मिटरावर एकही फेरीवाला बसणे अपेक्षित नाही. त्यामुळे या फेरिवाल्यांवर सातत्याने कारवाई करावी अशी मागणी आमदार पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे.
दिवा भागात पाणी पुरवठा पुर्ननियोजनाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. एकूण २१२ कोटींचा हा प्रकल्प आहे. २०१९ मध्ये सुरु झालेल्या या प्रकल्पाचे काम तीन वर्षात पुर्ण होणे अपेक्षित होते. करोनामुळे हे काम वेळेत पुर्ण होऊ शकलेले नाही. असे असतानाच ठेकेदाराचे देयक थकल्यामुळे हे काम संथगतीने सुरु असल्याची माहीती पाटील यांनी दिली. तर ठेकेदाराला १५ कोटी रुपये देण्यात आले असून त्याचे पुढचे ५० कोटी रुपयांचे देयक थकले आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.