ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील पदपथावरील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश जाहिरात विभागाने अतिक्रमण विभागाला दोन वर्षांपूर्वी दिले होते. परंतु, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत याप्रकरणी मनसेने कारवाईचा इशारा दिला आहे.
ठाणे शहरात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांमुळे पुन्हा एकदा अनधिकृत जाहिरात फलकांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एकीकडे हवामान बदलामुळे धोका वाढत असतानाच, दुसरीकडे ठाणे महापालिका अजूनही पदपथावरील अनधिकृत जाहिरात फलकांवर ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी केला आहे. एक वर्षांपूर्वी घाटकोपरमध्ये जाहिरात फलक पडून १७ लोकांचा बळी गेला होता. या प्रकरणाला वर्ष उलटले तरी अद्यापही ठाणे महापालिका अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यास गंभीर नसल्याचे दिसून येत आहे, असे पाचंगे यांनी म्हटले आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का आणि महापालिकेने जर या फलकांवर तातडीने कारवाई करावी आणि लोकांना सुरक्षितेची हमी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
२१ जून २०२३ रोजी वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील हिरानंदानी मेडोज व सिंघानिया शाळेजवळ लावण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाईचे आदेश जाहिरात विभागाने अतिक्रमण विभागाला दिले होते. मात्र, आजतागायत संबंधित ठिकाणी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. असा आरोप करत पाचंगे यांनी या कारवाईच्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त केली. तसेच महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशा अनधिकृत फलकांमुळे पदपथावरून चालणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. पदपथावरील या अनधिकृत जाहिरात फलकांबाबत ठाणे महानगरपालिकेने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन?
उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका क्र. १३६/२००९ नुसार पदपथावर आणि रस्त्यावर जाहिरात फलक लावणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार, महानगरपालिकेला अशा अनधिकृत फलकांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनसेच्या तक्रारीत ठाणे महापालिका आणि संबंधित विभागांनी न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.