ठाणे – ठाणे आणि नवी मुंबई शहरातील सर्वच रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधा पुरविण्यासंबंधी आयोजित केलेल्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी दिघा येथील धरण नवी मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्याची सुचना रेल्वे प्रशासानाला केली. हे धरण हस्तांतरीत झाल्यास दिघा येथील पाणी समस्या दूर होण्यास मदत होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

ठाणे आणि नवी मुंबई विभागीय रेल्वे प्रवाशांच्या समस्या आणि मागण्यासंदर्भात खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हिरेश मीना यांची बुधवारी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी झालेल्या बैठकीत नवी मुंबईतील स्थानके आणि ठाणे रेल्वे स्टेशनवरील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

वर्तकनगर येथील आरक्षण खिडकी लवकरात लवकर सुरू करण्याबाबत खासदार म्हस्के यांनी निर्देश दिले. तसेच दिघा, भोलानगर, अनंत नगर रेल्वे खालून गणपती पाडा येथे राहणाऱ्या रहिवाश्यांकरिता जाण्या-येण्याकरिता भुयारी मार्ग बनवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावर रेल्वे महाव्यवस्थापकांनी समस्यांवर तोडगा काढण्याचे तसेच लवकरच स्थानकांचा पाहणी दौरा करणार असल्याचे आश्वासन दिले.

दिघा परिसरातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. या भागाला दिघा धरणातून पाणी पुरवठा झाला तर येथील पाण्याची समस्या सुटू शकेल, असे अंदाज वर्तविले जात असून तशी मागणीही गेल्या काही महिन्यांपासून होत आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन खासदार म्हस्के यांनी दिघा येथील धरण नवी मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा केली. हे धरण हस्तांतरीत झाल्यास दिघा येथील पाणी समस्या दूर होण्यास मदत होईल, असे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे विभागाच्या निदर्शनास आणून दिले.

स्थानकातील समस्यांवर चर्चा

ठाणे आणि नवी मुंबई शहरातील सर्वच रेल्वे स्थानकांमधील शेड पत्रे, पंखे, विद्युत दिवे, ध्वनिक्षेपक दुरूस्ती करणे. बाहेरील पेव्हर ब्लॉक दुरूस्त करणे. स्थानकाबाहेरचा परिसर स्वच्छ करणे. रेल्वे स्थानकांमध्ये पिण्याच्या पाण्याचे कुलर बसविण्यांत यावे. दिघा ते तुर्भे स्थानकाबाहेर बुट पॉलीश धारकांना जागा देणे. काही स्थानकांमध्ये सरकते जिने बसविणे.

ऐरोली स्थानकामध्ये आरक्षण खिडकी सुरू करणे. बहुमजली वाहनतळासह कोपरखैरणे स्थानकाबाहेरील पार्किंग व्यवस्था सुस्थितीत करणे. रात्रीची गस्त वाढविणे. रबाले स्थानक पश्चिमेकडील तिकीट खिडकी रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवणे. सानपाडा-जुईनगर रेल्वे पुलाचे थांबलेले काम लवकर सुरू करणे अशा अनेक प्रलंबित समस्यांसंदर्भात म्हस्के यांनी बैठकीत चर्चा केली. या समस्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन त्यानुसार कार्यवाही करावी, अशी सूचनाही त्यांनी केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबई शहरातील रेल्वे स्थानकांचा पाहणी दौरा मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापकांसमवेत आयोजित करण्यात येणार आहे. सिडको कडील रेल्वे स्टेशनच्या समस्या, नवी मुंबईमधील रेल्वे स्टेशन हस्तांतरित करण्यासंदर्भात सिडको अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितले.