ठाणे जिल्हात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्याने खाडी, नद्यांच्या विळख्यात असलेल्या कल्याण, डोंबिवली परिसराला महापुराच्या पाण्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे शासन आदेशावरून राष्ट्रीय आपत्ती दल बचाव पथकाची एक तुकडी कल्याण-डोंबिवलीत दाखल झाली आहे. ठाणे जिल्ह्याला उद्या हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ उल्हासनगर, भिवंडी आणि कल्याण डोंबिवली पालिकांसाठी हे पथक कार्यरत राहणार आहे. या पथकामध्ये २२ जवान कार्यरत आहेत. दाखल होताच या पथकाने कल्याण मधील दुर्गाडी खाडी किनारी जाऊन उंच सखल भाग. महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर करावयाच्या उपाय योजनांची पूर्व तयारीची पाहणी केली. कल्याण, उल्हासनगर भागात लहान मोठ्या टेकड्या आहेत. तेथे दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. गेल्या तीन वर्षापासून कल्याण, डोंबिवलीत अतिवृष्टीच्या काळात महापुराची परिस्थिती निर्माण होते. खाडी किनारा परिसर जलमय होतो. डोंबिवली, कल्याण, टिटवाळा भागात खाडी, उल्हास, काळू, रायती नदीचे पाणी घुसते. या कालावधीत पालिकेची आपत्कालीन यंत्रणा, अग्निशमन दल यंत्रणा सक्रिय असते. परंतु महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यावर रहिवाशांना पुरातून बाहेर काढण्याचे काम राष्ट्रीय आपत्ती बचाव दल पथकाचे जवान योग्यरितीने करतात. त्यामुळे जिल्हा महसुल विभागाच्या आदेशावरून कल्याण डोंबिवलीत एक पथक दाखल झाले आहे. मुसळधार पावसाचा इशारा असे पर्यंत हे दल कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत सक्रिय असणार आहे. राजेश यावले या पथकाचे प्रमुख आहेत. या पथकाच्या प्रमुखांनी पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली.