उल्हासनगरः गेल्या काही महिन्यात रस्त्यावर पडलेले खड्डे, खोदकामाच्या ठिकाणी सुरक्षा साधनांचा अभाव यामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही खड्ड्यात पडून दुखापत होण्याची मालिका सुरूच असून उल्हासनगर शहराच्या कॅम्प चार भागात अशाच एका घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. सध्या या व्यक्तीवर कळव्याच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र रस्त्यावर तयार झालेले खड्डे आणि खोदकाम आता नागरिकांच्या जीवावर उठू लागल्याचे चित्र आहे.
उल्हासनगर कॅम्प चार भागात पालिकेच्या प्रभाग कार्यालयाशेजारी असलेल्या रस्त्यावर एका खड्ड्यात पडून विरेंद्र कुमार नावाची व्यक्ती गंभीर जखमी झाली. मंगळवारी उल्हासनगरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या रस्त्यावर पाणी साचले होते. खड्ड्यातही पाणी साचल्याने त्याचा अंदाज आला नाही. कामावरून घरी परतत असताना विरेंद्र यांना खड्ड्याचा अंदाज न आल्याने ते खड्ड्यात पडले त्यामुळे त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर त्यांना तात्काळ उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अपघातात गंभीर इजा झाल्याने त्यांना कळवा येथील शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले.
सध्या त्यांच्यावर कळवा येथेच उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेनंतर उल्हासनगरातील रस्ते आणि खोदकामातील बेजबाबदारपणावर संताप व्यक्त होतो आहे.बेजबाबदारपणावर संतापउल्हासनगरात सध्याच्या घडीला एमएमआरडीच्या निधीतून सुरू असलेले रस्त्याचे काम, भूयारी गटार योजनेचे काम, काही ठिकाणी रस्ते रूंदीकरण आणि इतर कामांसाठी खोदकाम करण्यात आले. या कामाच्या ठिकाणी सुरक्षेची योग्य काळजी घेतली जात नसल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे. कामाच्या ठिकाणी माहिती फलक लावणे, खोदकामाच्या ठिकाणी सुरक्षा बॅरिगेट किंवा पट्ट्या लावणे या गोष्टी होताना दिसत नाही. वारंवार आदेश देऊनही कंत्राटदार सुरक्षेच्या बाबींकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते आहे.
अपघातांची मालिका सुरूच
काही महिन्यांपूर्वी खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात उल्हासनगर मध्यवर्ती रूग्णालयात सेवा देणाऱ्या एका तरूण डॉक्टरला आपला जीव गमवावा लागला होता. तर खोदलेल्या खड्ड्यात पडल्याने कॅम्प पाच भागात एका तरूणाला आपला जीव गमवावा लागला होता. तर पहाटे खोदकामाच्या खड्ड्यात पडल्याने एक ज्येष्ठ नागरिक नुकतेच जखमी झाले होते. त्यापूर्वी भुयारी गटार योजनेच्या कामाच्या ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यात एक दुचाकीस्वार जाऊन पडल्याने जखमी झाला होता. ही अपघातांची मालिका अजुनही सुरूच आहे.उल्हासनगरातील अपूर्ण विकासकामे, त्यावरची फक्त कागदी देखरेख, आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे सामान्य नागरिकांना प्राण गमावण्याची वेळ येऊ नये, अशी मागणी आता जोर धरत आहे. प्रशासनाने तत्काळ अशा खड्ड्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षित करावे, अशी स्थानिकांची ठाम मागणी आहे.