ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, ४ सप्टेंबरला नवी मुंबईत येणार आहेत. पंतप्रधान नवी मुंबईत येणार असल्याने प्रशासनासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
केंद्र सरकारच्या बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या वतीने जेएन पोर्ट पीएसए मुंबई टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन समारंभ ४ सप्टेंबरला दुपारी होणार आहे. हे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी सिंगापूरचे पंतप्रधान लाॅरेन्स वोंग हे उपस्थित असणार आहे. तसेच केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री शांतनु ठाकूर, खासदार अप्पा बारणे, उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी उपस्थित असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईत येणार असल्याने प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. नवी मुंबईत पोलिसांकडूनही सर्वत्र तपासणी केली जात आहे. तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. मोदी हे या कार्यक्रमात काय वक्तव्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.