Manoj Jarange Patil Mumbai Protest ठाणे : मराठा आंदोलकांना आज दुपारपर्यंत मुंबई मोकळी करण्याच्या सूचना उच्च न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ठाणे आणि नवी मुंबईतून मुंबईकडे जाणाऱ्या वेशीवर पोलिसांनी कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी सकाळपासून पोलिस मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची चौकशी करत आहेत. त्यात, ज्या गाड्या मराठा आंदोलनाच्या आहेत त्यांना अडविले जात आहे. ठाणे आनंदनगर टोलनाक्यावर अशाचप्रकारे मराठा आंदोलनाच्या गाड्या पोलिसांनी अडविल्या यावेळी ते आंदोलक पोलिसांसोबत वाद घालत असल्याचे दिसून आले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळत असून राज्यभरातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदानासह आसपासचे परिसर आणि रेल्वे स्थानक परिसर आंदोलकांच्या गर्दीमुळे गजबजला आहे.

यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना तसेच नोकरदार वर्गाला बसत आहे.गेले पाच दिवस अशीच परिस्थिती असल्यामुळे उच्च न्यालयाने मंगळवारी दुपार पर्यंत मुबंई मोकळी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

तसेच मराठा आंदोलकांच्या गाड्यांना मुंबईत प्रवेश देऊ नका अशा सुचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळपासून ठाणे, नवी मुंबईच्या वेशीवर पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठाणे आनंदनगर टोल नाक्यावर मंगळवारी सकाळपासून वाहनांची चौकशी केली जात आहे. यातील ज्या मराठा आंदोलनाच्या गाड्या आहेत त्या बाजूला करण्यात येत आहे.

परिणामी, याठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. यातील काही मराठा आंदोलकांच्या गाड्या अडविण्यात आल्या त्यातील काही मराठा आंदोलकांनी यावेळी पोलिसांसोबत वाद घातला. खारेगावर टोलनाक्याला आम्हाला अडविले नाही तर, आनंदनगर टोलनाक्यावर आम्हाला का अडविले जात आहे असा आरोप हे मराठा आंदोलक करत होते.