ठाणे : मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राबाबत महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरविल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कळवा येथील रवी वर्माला (२७) सोमवारी दुपारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ५ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आवश्यक तपास तसेच घटनास्थळांचा पंचनामा करण्यासाठी ही पोलीस कोठडी मिळाली आहे.
कळवा भागात राहणारा रवी वर्मा हा एका कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करत होता. संबंधित कंपनी मुंबई येथील नौदलाच्या गोदीला सेवा पुरवत होती. वर्मा हा गोदीमध्ये कामानिमित्ताने जात होता. त्याच्याकडे गोदीचे नकाशे आणि छायाचित्र होती. हे छायाचित्र आणि नकाशे त्याने एका तरुणीला पुरवल्याचा आरोप आहे. सामजमाध्यमावर ‘मुधाजाला’च्या आधारे (हनीट्रॅप) त्याला पाकिस्तानच्या गुप्तहेरांनी जाळ्यात ओढल्याचा संशय आहे. त्याला एटीएसच्या पथकांनी अटक केल्यानंतर सोमवारी त्याला ठाणे न्यायालयात न्यायाधीश जे. एस. जगदाळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर सरकारी वकील आणि वर्मा याचे वकील राजहंस गिऱ्हासे, रुपाली शिंदे यांनी युक्तीवाद सुरू केला. या प्रकरणाचा आणखी तपास आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायाधीशांसमोर दावा केला. त्याच्याकडे आवाजाचे नमून आढळले आहेत असे सरकारी वकिलांनी सांगितले. तर आम्ही प्रत्येक वेळी एटीएसच्या तपासात सहकार्य केले होते. परंतु आता कोणतीही नोटीस न बजावता वर्मा याला अटक करण्यात आल्याचा दावा वर्मा याच्या वकिलांनी केला. २६-२७ वर्षांचा मुलगा असे काही करणार नाही, एटीएसच्या पथकाला आवाजाचे नमूने घ्यायचे होते. ते त्यांनी घेतले आहेत असेही ते म्हणाले. तसेच वर्मा याच्या वकिलांनी त्याचे पोलीस पडताळणीचे पुरावे न्यायाधीशांसमोर सादर केले. तर सरकारी वकिलांनी ही पोलीस पडताळणी २०२१ मध्ये झाली आहे असे सांगितले. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी वर्मा याला ५ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
न्यायाधीशांसमोर सुनावणीसाठी रवी वर्माला हजर केल्यानंतर त्याला न्यायाधीशांनी त्याचे नाव विचारले. त्याने नाव सांगितल्यानंतर एटीएस बाबत काही तक्रार आहे का? असे न्यायाधीशांनी त्याला विचारले. माझी एटीएस बाबत काही तक्रार नाही. परंतु मी खूप घाबरलेलो आहे असे वर्मा म्हणाला.
वर्मा याच्याकडे काही नोंद आढळून आली आहे. त्यामध्ये सिंघल सर असे नमूद आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणी आरोपी आहे का, याचा तपास करायचे असल्याचेही सरकारी वकिलांनी सांगितले. त्यामुळे हा सिंघल सर कोण असा प्रश्न उभा राहिला आहे.