ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव, मानकोली, रांजनोली आणि तीन हात नाका या भागातील अपघात कमी करण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) पत्रव्यवहार करून तात्पुरत्या स्वरूपातील तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये पादचाऱ्यांना चालण्यासाठी सुविधा उपलब्ध करणे, बेकायदेशीररित्या दुभाजकामध्ये रस्ते ओलांडण्यासाठी उघडण्यात आलेले भाग बंद करणे, विद्युत खांब उभारणे यासारख्या बाबींचा सामावेश आहे.

मुंबई नाशिक महामार्गावरून दिवसाला हजारो जड अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतुक होते. ठाणे आणि भिवंडी शहरातून हा महामार्ग जातो. महामार्गाच्या दोन्ही बाजूला लोकवस्ती देखील मोठ्याप्रमाणात आहे. तसेच कल्याण, नाशिक, भिवंडी आणि मुंब्रा भागातून मुंबईच्या दिशेने वाहतुक करणारी हजारो वाहने या मार्गाने वाहतुक करत असतात. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अर्थात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्रात अपघाताचे प्राणांकित अपघाताचे प्रमाण अधिक आहे. सध्या २०२१ पासून महामार्गावरील माजिवडा ते वडपे या भागात मार्गिकेच्या रुंदीकरणाचे काम एमएसआरडीसीकडून सुरू आहे. परंतु अनेकदा रस्ता ओलांडताना किंवा इतर कारणांमुळे या मार्गावर अपघात घडत असतात.

अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, ठाणे वाहतुक पोलीस यासह सर्वच विभागाकडून उपाययोजनांसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार, ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि ठाणे वाहतुक पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी सर्वेक्षण केले होते. अपघातांचे प्रमाण, वेळ आणि अपघाताची कारणे यांचा यामध्ये सामावेश होता. दरम्यान, डिसेंबर महिन्यात रस्ता सुरक्षा बैठक पार पडली. या बैठकीनंतर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने एमएसआरडीसीला पत्रव्यवहार करून उपाययजोनांची सूचना केली आहे.

यामध्ये मानकोली नाका, खारेगाव टोलनाका, रांजनोली नाका आणि तीन हात नाका या अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या उपाययोजना करण्याचे सूचित केले आहे. दिशादर्शक आणि माहितीचे फलक बसविणे, पादचाऱ्यांना चालण्यासाठी सुविधा उपलब्ध करणे, दुभाजकामध्ये बेकायदेशीररित्या रस्ते ओलांडण्यासाठी उघडण्यात आलेले वळण भाग बंद करणे, विद्युत खांब उभारणे, रात्रीच्या वेळेत चालकांची दृष्यमानता वाढविण्यासाठी चकाकरणारे साधने बसविणे इत्यादी उपाययोजनांचा यामध्ये सामावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रादेशिक परिवहन विभागाकडून उपायोजनांबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. एमएसआरडीसीकडून मुंबई नाशिक महामार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू आहे. याचाच भाग म्हणून काही ठिकाणी मुख्य मार्गिकेखालून भुयारी मार्गिकाही बांधल्या जात आहे. त्यामुळे रस्ते ओलांडण्याच्या संख्येत घट होऊन अपघातप्रवण क्षेत्र कायमचे बंद होईल. तसेच इतर उपाययोजनाबाबत कामे सुरू आहेत.  रामचंद्र डोंगरे, उप अभियंता, एमएसआरडीसी