शहापूर तालुक्यातील धसई ते डोळखांब आणि धसई ते किन्हवली या रस्त्यांची पूर्णपणे चाळण झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. चालकांना या रस्त्यांवरून वाहने चालवताना अडथळे येत आहेत, तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या महत्त्वाच्या रस्त्यांची डागडुजी करण्यास टाळाटाळ करीत असल्याने स्थानिक ग्रामस्थ आंदोलन करण्याचा विचार करीत आहेत.
शहापूर तालुक्यातील डोळखांब, किन्हवली, शेणवा, सरळगाव, मुरबाड परिसरात मोठाले गृहप्रकल्प आकाराला येत आहेत. मुरबाड परिसरात एमआयडीसी आहे. डोळखांबजवळ घाटघर विद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पाकडे आणि या भागातील गावांमध्ये जाण्यासाठी शहापूर ते डोळखांब, शहापूर ते किन्हवली धसई मार्ग हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारे एकमेव रस्ते आहेत.
या रस्त्यांवरून एस.टी., खासगी वाहतूक, जीप, अवजड वाहने व इतर वाहनांचा चोवीस तास राबता असतो. मागील पावसाळ्यात या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले होते. ते खडी टाकून बुजवण्यात आले होते. ऑक्टोबरनंतर या रस्त्यांची डागडुजी करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्थानिक लोकप्रतिनिधींना सांगण्यात येत होते. सहा महिने उलटले तरी धसई ते डोळखांब, किन्हवली रस्त्यांची डागडुजी करण्यात आली नाही. नागरिकांचा रोष कमी करण्यासाठी धसई ते शिलोत्तर या फर्लागभर रस्त्याची डागडुजी करण्याचा देखावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात आला. त्यानंतर हे काम बंद करण्यात आले. मागील काही महिन्यांपासून हे काम बंद आहे. पुढील रस्त्यांची डागडुजी कधी होणार, याविषयी विभागाचे अधिकारी बोलण्यास तयार नाहीत. धसई येथे एक भव्य गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे.