“सिंगापूरसारखे रस्ते असावे आणि युरोप सारखे शहर असावे, असे अनेकांना वाटते. परंतु भारतात स्थानिक परिस्थितीमुळे असे करणे शक्य नसले तरी आम्ही ठाणे शहराची लाज वाटणार नाही अशाप्रकारच्या सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत,” असा दावा ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी केला. ते सोमवारी (२८ फेब्रुवारी) ठाण्यातील पुरस्कार वितरण साहोळ्यात बोलत होते. “ठाणे महापालिकेत गेली ३० वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. परमार्थ करताना थोडा स्वार्थ साधायचा असतो. एखादी चूक झाली तरी टीका होते. तसेच केलेल्या चांगल्या कामांचे श्रेय देखील आमचेच आहे,” असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
नरेश म्हस्के म्हणाले, “विविध विकास कामांवरून आमच्यावर सातत्याने टीका केली जात असेल, तर शहरात सुरू असलेल्या इतर चांगल्या विकास कामांचे श्रेयही आम्हालाच मिळायला हवे. दोन वर्षाच्या करोना काळात ठाणे महापालिकेने आणि विशेष करून लोकप्रतिनिधीनी ठाणेकरांची साथ सोडली नाही. राज्यातील मुंबई आणि नागपूर या दोन मोठ्या महापालिका असल्या तरी, १२०० खाटांचे रुग्णालय १२ दिवसांत उभे करणारी ठाणे महापालिका ही एकमेव पालिका ठरली आहे.”

“गेल्या काही वर्षात कोणत्याही कराची वाढ नाही”
“पालिकेची आर्थिक परिस्थिती नसतानाही प्राणवायू, रेमडीसीवर आणि करोना लसीकरणाची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली. गेल्या काही वर्षात पालिकेने कोणत्याही कराची वाढ केलेली नाही. कर वसुली आणि राज्य शासनाचे अनुदान यातूनच पालिकेचा रहाटगाडा चालविला जातो. यातूनच ठाणेकरांना जितक्या जास्त सोयीसुविधा देणे शक्य होतात, त्या पुरविण्याचे काम केले जात आहे,” असं नरेश म्हस्के यांनी सांगितलं.
“करोना काळात जीव धोक्यात घालून काम केले”
म्हस्के म्हणाले, “करोना काळात पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी जीव धोक्यात घालून काम केले. या सर्वांनी ठाणेकरांना औषधापासून ते जीवनावश्यक वस्तुची सुविधा दारापर्यंत पोहचविली आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींवर टीका करणे सोपे असते, पण ते धोका पत्करून काम करतात, याचीही जाणीव असणे गरजेचे आहे.”
हेही वाचा : डोंबिवली : कुऱ्हाड-कोयत्याचा धाक दाखवत अंत्यसंस्कार रोखला, नातेवाईकांना जबर मारहाणीचा धक्कादायक प्रकार
“ठाण्याच्या विकासात योगदान देणाऱ्या नागरिकांचा सत्कार होत असल्याने ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी सांगितले. ठाणे शहराला क्रीडा आणि सांस्कृतिक शहराचा वारसा असून ठाणे शहर पर्यावरणपूरक शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात ठाणेकरांचा मोठा वाटा आहे,” असंही म्हस्के यांनी नमूद केलं.