मागील पंधरा दिवसांपासून मध्य रेल्वेच्या कळवा ते कसारा, इगतपुरी, कर्जत ते लोणावळा विभागातील स्थानकांवर रास्त दरात मिळणाऱ्या ‘रेल नीर’ (पाण्याच्या बाटल्यांचा) तुटवडा जाणवत आहे. स्थानकांवरील जनजल योजना बंद, पाणी पुरवठ्याचे नळ नादुरुस्त असल्याने आता रेल नीरचा तुटवडा जाणवत असल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. परिणामी प्रवाशांना खिशाला कात्री लावून महागडे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. कल्याण, ठाणे स्थानकांवरील उपहारगृहांमध्ये रेल नीर उपलब्ध आहे. मग कळवा ते कसारा, कर्जत, लोणावळा, इगतपुरी विभागातील रेल्वे स्थानकांवरच रेल नीर पाण्याचा तुटवडा का?, असे प्रश्न प्रवासी करत आहेत. उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या प्रवाशांना सतत पाणी लागते. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस, मेलमधून प्रवास करणारे प्रवासी जंक्शन स्थानकावर उतरून रेल नीर पाण्याची मागणी करतात. मात्र रेल नीर उपलब्ध होत नसल्याने, त्यांना पर्यायी पाण्याची बाटली विकत घ्या असे सांगण्यात येत आहे. रेल नीरचा तुटवडा असलेल्या रेल्वे स्थानकांवरील खाद्यान्न विक्रेत्यांशी प्रतिनिधीने संपर्क साधला असता. त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, रेल्वे खाद्यान्न आणि पर्यटन मंडळाने मध्य रेल्वेला पत्र पाठवून ३ मे ते २० मेपर्यंत कळवा ते कसारा रेल्वे स्थानकां दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवर, कर्जत, इगतपुरी, लोणावळा विभागातील स्थानकांवर रेल नीरच्या पुरवठ्यात कपात करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच, रेल्वेच्या वरिष्ठ वाणीज्य विभागीय व्यवस्थापक टी. सुषमा यांनी या रेल्वे विभागातील सर्व स्थानकांवरील खाद्यान्न विक्रेते, परवानाधारी विक्रेत्यांना पत्र पाठवून रेल नीरचा तीन आठवडे तुटवडा होणार असल्याने, रेल नीरच्या ऐवजी मान्यताप्राप्त हेल्थ प्लस, रोकोको, गॅलन्स, निमबस, ऑक्सिमोह ॲक्वा या बंदिस्त पाणी बाटल्यांची घाऊक विक्रेत्यांकडून खरेदी करावी, असे सुचविले आहे. रेल नीरची एक बाटली १५ रूपयांना मिळते. इतर कंपनीच्या बाटल्या २० रूपयांना विकल्या जातात. पाण्याच्या चढ्या दरावरून प्रवासी, विक्रेते यांच्यात वाद होत आहेत, असे विक्रेत्यांनी सांगितले. रेल नीरचे घाऊक विक्रेते प्रत्येक स्थानकात जाऊन विक्रेत्यांना पाणी बाटल्यांचे खोके पोहच करत होते. इतर विक्रेते मुंब्रा, कळवा, कल्याण स्थानकात किंवा अन्य स्थानकात येऊन डोंबिवलीतील विक्रेत्याला तुम्हाला पाणी बाटल्यांचा साठा हवा असेल, तर मुंब्रा येथे या आणि साठा घेऊ जा, असे कळवितात. हा साठा आणण्यासाठी विक्रेत्यांनी दोन हजार रूपये टेम्पोचे भाडे द्यावे लागते. रेल नीर १२ बाटल्यांचा खोका १२० रूपये, ऑक्सिमोर १२ बाटल्या एक खोका ११५ रूपये, निंबसचा १५ बाटल्या एक खोका ११८ रूपयांना विक्रेत्यांना मिळतो. रेल नीरच्या तुटवड्यामुळे प्रवाशांना वाढीव किमत मोजून पाणी विकत घ्यावे लागते. रेल नीरसह इतर बाटल्या अर्धा लीटरच्या केल्या तर प्रवाशाला त्या हाताळणे सोयीचे होईल. एक लीटरची बाटली प्रवासी तत्काळ पिऊ शकत नाही. ती बाटली घेऊन त्याला मिरवावे लागते, असे विक्रेत्यांनी सांगितले. उन्हाचे दिवस आहेत. पिण्याच्या पाण्याची मागणी वाढते. त्याचा परिणाम रेल नीरवर होऊ शकतो. तरी नक्की कारण आयआरसीटीकडून समजून घ्यावे लागेल. असे जनसंपर्क अधिकीर अनिलकुमार जैन यांनी सांगितले आहे. रेल नीरचा कोणत्याही स्थानकावर तुटवडा नाही. मागणीप्रमाणे तो विक्रेत्यांना पुरवठा केला जातो. अशी माहिती रेल नीर, मुख्य पर्यवक्षेक सागर नाईक म्हणाले आहेत.