ठाणे : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत असून वेगवेगळ्या पद्धतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात येत आहे. ठाण्यातील कोर्टनाका भागात मंगळवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मूक निदर्शने केली. तसेच काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध नोंदवला.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर याने भर न्यायदान कक्षात बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्याने या कृत्याबद्दल पश्चातापही व्यक्त केला नाही. त्यानिषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली तसेच ॠताताई आव्हाड यांच्या उपस्थितीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शने करण्यात आली. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना राकेश किशोर तिवारी या वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवर हल्ला असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. सर्व कार्यकर्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून तसेच हातात संविधानाच्या प्रति घेऊन बसले होते.
सोमवारी राकेश किशोर या वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीश म्हणजे, देशाच्या न्यायप्रक्रियेतील सर्वोच्च स्थान आहे. आज तेही सुरक्षित नसतील तर देशातील एकही नागरिक सुरक्षित नाहीत, हेच स्पष्ट होत आहे. खजराहो येथील विष्णू मंदिराबाबत किशोर यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी, खजुराहो हा जागतिक वारसा असून ते पुरातत्व खात्याच्या अखत्यारित येत आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याकडे जावे. मात्र, राकेश किशोर हे ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हते. त्यांनी बूट फेकण्याचा घृणास्पद प्रकार केला. हा बूट फेकण्याचा प्रयत्न फक्त न्यायव्यवस्थेवर नव्हता. तर ते बौद्ध समाजातून आलेले असल्यानेच राकेश किशोर याने हे कृत्य केले आहे.
याआधीही भूषण गवई जेव्हा महाराष्ट्रात आले होते. तेव्हाही राज्य शासनाने त्यांना प्रोटोकॉल दिला नव्हता. यावरून मागासवर्गीय माणूस सर्वोच्च स्थानी बसल्याचे या लोकांना मान्य नसल्याचेच दिसून येत आहे, असा आरोप मनोज प्रधान यांनी केला. या घटनेचा आम्ही निषेध करतो. ही घटना फक्त व्यक्ती म्हणून न पाहता न्यायव्यवस्थेवर केलेला हल्ला आहे, असे प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी सांगितले. सनातन धर्माच्या नावाखाली दंगली भडकावण्याचा प्रयत्न असून हा देशातील नागरिकांवरील हल्ला आहे, अशी टीका युवक अध्यक्ष अभिजीत पवार यांनी केली.