उल्हासनगरः उल्हासनगरच्या सेंच्युरी रेयॉन कंपनीत झालेल्या टँकर स्फोटाप्रकरणी कंपनी प्रशासन आणि टँकरच्या चालक आणि मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनी प्रशासनाने खबरदारी घेतली नाही आणि टँकर मालकाने पुरेशी काळजी घेतली नाही यामुळे हा अपघात झाल्याचे गुन्ह्यात नोंद करण्यात आले आहे. या स्फोटात चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता. उल्हासनगरच्या शहाड भागातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत शनिवारी टँकरचा भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर यात सहा जण जखमी झाले होते. कंपनीत एमएच ०४ जीली २४८७ या टँकरचा स्फोट झाला होता.

हेही वाचा >>> “गणपतीसाठी चांगला रस्ता न बनविणाऱ्या सत्ताधाऱ्यांना येत्या निवडणुकीत…”, राजू पाटील यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टँकर भरत असताना हा प्रकार झाला. यावेळी कंपनीच्या वतीने जीवीताची आणि सुरक्षिततेची जबाबदारी कंपनी प्रशासनाची होती. कंपनी प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतली नाही. तसेच टँकर मालकानेही टँकर पाठवताना टँकरमध्ये अन्य कोणताही स्फोटक वायू शिल्लक राहणार नाही याची खातरजमा न करता टँकर कंपनीत पाठवला. त्यामुळे स्फोट झाल्याचे दाखल गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी सेंच्युरी रेयॉन कंपनीत भेट देऊन प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालक विभगाचे अधिकारी तसेच कंपनी व्यवस्थापन विभागाचे महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. या संपूर्ण घटनेची तातडीने चौकशी व्हावी यासाठी कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना यावेळी डॉ. शिंदे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. या घटनेत मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबांना प्रत्येकी १३ लाख रुपये कंपनी व्यवस्थापनातर्फे देण्यात येणार आहे. या कामगारांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी आणि त्यांच्या मुलांचे दहावी पर्यंतचे शिक्षणही कंपनीमार्फत केले जाणार असल्याचे यावेळी कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. या बैठकीनंतर अपघातातील जखमी कामगारांची उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालय येथे जाऊन डॉ. शिंदे यांनी भेट घेतली.