ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या ४७ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न भंगले असतानाच, त्यापाठोपाठ सोमवारी उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी ३३४ उमेदवारांपैकी ९० उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे जिल्ह्यात २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.

ठाणे जिल्ह्यात एकूण १८ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मिरा-भाईंदर, ओवळा-माजीवडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे शहर, मुंब्रा-कळवा, ऐरोली, बेलापूर या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढण्यासाठी ३८१ उमेदवारांनी ४९५ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. महायुती, महाविकास आघाडी, अपक्ष, बंडखोर उमेदवारांचा समावेश होता. हे सर्वजण निवडणूक लढण्याची तयारी करीत होते. परंतु अर्ज छाननी प्रक्रियेत ४७ उमेदवारांचे ७८ अर्ज बाद झाले आहेत. यामुळे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडल्याने त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न भंगले. असे असले तरी बंडखोरांमुळे महायुती, महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली होती. दरम्यान, साम, दाम, दंड, भेद या सर्व पर्यांचा वापर करूनही काही ठिकाणी बंडोबांनी माघार घेतलेली नाही. तर, जिल्ह्यात काही ठिकाणी बंडोबांसह अपक्षांनी माघार घेतली. जिल्ह्यात सोमवारी उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी ३३४ उमेदवारांपैकी ९० उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे जिल्ह्यात २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. यामुळे १८ विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांची यादी आता अंतिम झाली असून या उमेदवारांमध्ये आता लढती होणार आहेत. त्यात कोण बाजी मारणार, हे येत्या २३ नोव्हेंबरला स्पष्ट होईल.

हेही वाचा – डोंबिवलीत राज ठाकरे यांच्या सभेच्या दिवशी बेशिस्तीने वाहने चालविणाऱ्या १९ वाहनचालकांवर गुन्हे

हेही वाचा – डोंबिवली कचोरे येथे पेटलेला सुतळी बॉम्ब अंगावर फेकण्याच्या वादातून दोन भावांना मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भिवंडी ग्रामीणमध्ये ७ उमेदवार, शहापूरमध्ये ९ उमेदवार, भिवंडी पश्चिममध्ये १४ उमेदवार, भिवंडी पूर्वमध्ये ११ उमेदवार, कल्याण पश्चिममध्ये २४ उमेदवार, मुरबाडमध्ये ९ उमेदवार, अंबरनाथमध्ये २२ उमेदवार, उल्हासनगरमध्ये २१ उमेदवार, कल्याण पूर्वमध्ये १७ उमेदवार, डोंबिवलीमध्ये ८ उमेदवार, कल्याण ग्रामीणमध्ये १३ उमेदवार, मिरा-भाईंदरमध्ये १७ उमेदवार, ओवळा-माजीवाडामध्ये १४ उमेदवार, कोपरी पाचपाखाडीमध्ये ९ उमेदवार, ठाणे शहरमध्ये ८ उमेदवार, मुंब्रा-कळवामध्ये ११ उमेदवार, ऐरोलीमध्ये १७ उमेदवार आणि बेलापूरमध्ये १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.