ठाणे : भारताने दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तान मध्ये केलेल्या सिंदूर ऑपरेशन नंतर दोन्ही देशांचे सीमेवर सशस्त्र संघर्ष सुरू झाला आहे. मात्र या बाबत सोशल मीडियावर सर्रास खोट्या बातम्या पसरत असल्याचे दिसून आले आहे. आता याच ” सोशल मीडिया योद्ध्यांवर ” जिल्हा प्रशासनाची करडी नजर असून भारत-पाक तणावाच्या संदर्भात चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
भारत-पाक सीमेवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना शांतता आणि सलोखा राखण्याचे, नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जावू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे, महत्वाच्या इमारती आणि गर्दीच्या ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासकीय यंत्रणांनी जिल्ह्यातील विविध भागात मॉक ड्रील आयोजित करून कोणत्याही धोकादायक घटनेचा सामना करण्यासाठी तयारी ठेवली आहे. जिल्ह्यात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तर सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवा आणि द्वेषपूर्ण संदेशांवर प्रशासनाकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. तसेच भारत-पाक तणावाच्या संदर्भात चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. ठाणे जिल्हा प्रशासन आपल्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे,” असे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आश्वस्त केले आहे.