बदलापूरः गेल्या अनेक वर्षात न झालेला पूर्व मोसमी पाऊस यंदाच्या वर्षात पडला. तोही मे महिन्यात पडला. त्यामुळे जलस्त्रोतांमध्ये पाण्याचा वेगाने साठा झाला. गेल्या सहा वर्षांत न झालेला विक्रमी जलसाठा यंदा जून महिन्यातच झाला आहे. ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वच धरणांमध्ये जवळपास ५० टक्के जलसाठा झालेला आहे. बारवी, आंध्रा आणि भातसा धरणात चांगला जलसाठा झाला आहे. त्यामुळे पाण्याची चिंता काहीशी मिटली आहे. पावसाची रिपरिप सुरूच राहिल्यास धरणे विक्रमी वेळेत भरण्याची आशा आहे.
यंदाच्या वर्षात पावसाने वेळेपूर्वीच हजेरी लावली. फक्त पूर्व मोसमीच नाही तर मोसमी पाऊसही दरवर्षीपेक्षा आधी बरसला. मे महिन्याच्या सुरूवातीला पश्चिमी विक्षोभामुळे राज्यात आणि ठाणे जिल्ह्यात पाऊस पडला. त्यानंतर अवकाळी पावसानेही जोरदार हजेरी लावली. मे महिना हा उन्हाच्या कडाक्यामुळे घामांच्या धारात जाणारा महिना असतो. मात्र मे महिन्यात छत्री आणि रेनकोट वापरण्याची वेळ यंदा आली होती. एरवी जलस्त्रोतांमधील बाष्पीभवन होत असल्याने मे महिन्यात जलस्त्रोत आटतात. मात्र यंदा मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत होते. ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या उल्हास नदीने इशारा पातळी गाठली होती. त्यामुळे बदलापुरसारख्या शहरात ऐन मे महिन्यात पुरस्थिती निर्माण झाली होती. या अवकाळी आणि लवकर आलेल्या मोसमी पावसामुळे सगळीकडे तारांबळ उडाली असताना त्याचा जलस्त्रोतांना चांगला फायदा झाला.
जलस्त्रोतांमध्ये होणारे बाष्पीभवन यंदा झाले नाही. उलट जलस्त्रोतांत पाण्याची भरच पडली. जून महिन्यातही पावसाची संतताधर सुरू राहिली. त्यामुळे ठाणे जिल्हा आणि आसपासच्या भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे आणि शेजारच्या जिल्ह्यातील धरणांमध्ये विक्रमी पाणीसाठा झालेला आहे. यंदा २६ जून रोजी ठाणे जिल्ह्यातील बारवी आणि भातसा धरण निम्मे भरलेले आहे. बारवी धरणाची क्षमता ३३८ दशलक्ष घनमीटर इतकी असून २६ जून रोजी धरणात १७२.६७ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. बारवी धरण ५० टक्के भरलेले आहे. गेल्या सहा वर्षातील ही विक्रमी नोंद आहे.
उल्हास नदीत पुणे जिल्ह्यातील आंध्रा धरणातून पाणी सोडले जाते. हे धरण लवकर भरत नाही. मात्र यंदा या धरणातही ५१ टक्के इतका पाणीसाठा असून १७३.४९ दशलक्ष घनमीटर इतके पाणी उपलब्ध आहे. गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत हा आकडा दुप्पटीपेक्षा अधिक आहे. तर भातसा धरणाची क्षमता ९४२ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. सध्या धरणात ४३५.६४ दशलक्ष अर्थात ४६.१८ टक्के इतका पाणी साठा आहे. त्यामुळे जिल्ह्याची जलचिंता मिटली आहे.
धरणातील २६ जुनचा पाणीसाठा आकडेवारी
धरण | २०२५ | २०२४ | २०२३ | २०२२ | २०२१ | २०२० |
भातसा | ४६.१८ | २१ | २४.७० | ३० | ३३ | ३० |
बारवी | ५०.६७ | २५.३६ | २५ | ३१ | ३८ | ३९ |
आंध्रा | ५१.१६ | २५.३३ | २६ | १६ | १८ | ३१ |