शहापूर : आदिवासी नागरिकांचे प्रमाण जास्त असणाऱ्या शहापूर तालुक्यात सुमारे ३२७ गाव – पाड्यांमध्ये स्मशानभूमीच नसल्याची बाब उघडकीस आली आहे. स्मशनाभूमी अभावी मरणानंतरही मृतदेहाची हेळसांड होत असून पावसाळ्यात मृतदेहाचे दहन करण्याचा प्रश्न गंभीर होत आहे.
ठाणे जिल्ह्याचा शहापुर तालुक्यात प्रामुख्याने आदिवासी नागरिक वास्तव्यास आहेत. यामध्ये ११० ग्रामपंचायतींमध्ये २२७ गावे आणि ५१४ पाडे येतात. तालुक्यात तानसा, दापुर, कसारा (खु), भुईशेत, भोयेपाडा, गरेलपाडा, सावरदेव, पेंढरी, बोराळा, वारलीपाडा, भेकरमाळ, सावरखुट, उठावा, दापूरमाळ अशा ३२७ गावपाड्यांवर स्मशानभूमी नसल्याचे उघडकीस आले आहे. येथील ग्रामस्थांना पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. गावपाड्यांमधील अंतर्गत वाद या मुख्य कारणामुळे बहुतांशी ठिकाणी स्मशानभूमीची कामे मंजूर होऊन देखील ती रखडलेली आहेत.
तर, स्मशानभूमीचे पत्रे उडणे, स्मशानभूमी जमीनदोस्त होणे, स्मशानभूमीसाठी वनखात्याच्या जागेची अडचण, खाजगी जागेची अडचण, तर काही ठिकाणी रस्ता नसणे यामुळे स्मशानभूमी निर्मितीत अडचणी निर्माण होत आहेत. आदिवासी अतिदुर्गम भागात दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, तालुक्यातील नागरिकांना स्मशानभूमीसाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. अनेक गावात स्मशानभूमीपर्यंत रस्ता नसल्याने पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागते आहे. तर, काही ठिकाणी नदीतून मृतदेह न्यावे लागत आहेत. तर, उर्वरित स्मशानभूमीत छत नसल्याने उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे उघडकीस येत आहे. पावसामुळे मृतदेहाची हेळसांड होत असून शहापूर तालुक्यात हा प्रश्न गंभीर होत आहे.
शहापूर तालुक्यात ११० ग्रामपंचायतींमध्ये २२७ गावे आणि ५१४ पाडे येतात. तालुक्यात आरसीसी बांधकाम असलेल्या १९७ स्मशानभूमी आहेत. तसेच, २३१ स्मशानभूमी सुस्थितीत आहेत. तर, ३२६ ठिकाणी पक्क्या स्वरूपाच्या स्मशानभूमी नसून २२९ ठिकाणी स्मशानभूमींची पडझड झाली आहे. तसेच जमीन उपलब्ध नसल्याने देखील २२९ ठिकाणी स्मशानभूमी रखडल्या आहेत. याशिवाय बहुतांशी ठिकाणी रस्ते, वीज आणि पाण्याची सुविधा नसल्याने अंत्यसंस्कारासाठी नागरिकांची गैरसोय होत आहे.