ठाणे : एचएमपीव्ही या साथीच्या आजाराचे काही रुग्ण भारतातही आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला आहे. तसेच हा एक हंगामी रोग असून तो सामान्यतः फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

सध्या चीनमध्ये एचएमपीव्ही या साथीचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत असून भारतातही काही रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला सर्तक राहण्याचे निर्देश दिले आहेत. या विषाणूबाबत, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार, २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये या आराजाच्या रुग्णात कोणतीही वाढ झालेली नाही. असे असले तरी, खबरदारीचा भाग म्हणून श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे आणि काय करु नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. तो श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरतो. हा एक हंगामी रोग असून तो सामान्यतः फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत सुभाष रस्ता भागात दूषित पाणीपुरवठा, गटारांची खोदाई करताना जलवाहिन्या तुटल्या

विशेष वॉर्ड तयार

खबरदारीचा उपाय म्हणून कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १५ खाटांचा विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी

खोकला किंवा शिंका येत असतील, तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने हात वारंवार धुवा. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायूविजन (व्हेंटीलेशन) राहील, याची दक्षता घ्या. काहीही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा – आटगाव-तानशेत रेल्वे स्थानकांदरम्यान रूळावर लोखंडी पट्टी ठेऊन घातपाताचा प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरिकांनी काय करु नये

हस्तांदोलन करणे. टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर. आजारी लोकांशी जवळचा संपर्क. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे.