ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी आणि ठाणे तालुक्यांमध्ये ड्रेजर (यांत्रिक पद्धतीने ) होणाऱ्या रेती उत्खननास भुमिपुत्रांचा विरोध होऊ लागला आहे. सोमवारी येथील खाडीतून डुबी पद्धतीने रेती काढणाऱ्या भुमिपुत्र आणि आदिवासी मजूरांनी खाडीपात्रात ड्रेजरला घेराव घालून काळे झेंडे दाखवत आंदोलन केले.
विकासाच्या नावाखाली ड्रेजरने रेती उत्खनन केले जात आहे. यामुळे या भागातील हजारो भुमिपूत्र आणि आदिवासी बांधव बेरोजगार होणार असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. भिवंडीतील कशेळी आणि ठाण्यातील गायमुख भागात ३० ते ३५ गावे वसलेली आहेत. १९६० पासून येथील स्थानिक भूमिपुत्र शेतीला जोडधंदा म्हणून पारंपारिक डुबी पद्धतीने रेती काढण्याचा व्यवसाय करतात. या व्यवसायावर भूमिपुत्र आणि आदिवासी मजूर अशा २० ते २५ हजार जणांची उपजीविका अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांपासून यांत्रिकी पद्धतीने रेती काढायला परवानगी मिळाली आहे.
हेही वाचा >>>ठाणे- दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड
या शासन निर्णयामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे सोमवारी यांत्रिक पद्धतीच्या रेती उत्खन करण्यास भुमिपूत्रांनी विरोध करत येथील एका ड्रेजरला घेराव घातला. श्रीमंतांना अति श्रीमंत करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप भूमिपुत्रांनी केला आहे. यांत्रिक पद्धतीच्या रेती उत्खनानामुळे भुमिपूत्रांवर बेरोजगारीचे संकट आले आहे. उत्खनन करून काढलेली रेती संबंधितांकडून २ हजार ४०० रूपये ब्रासने महसूल विभाग खरेदी करणार असून ही रेती ६६० रूपये ब्रास या दराने बाजारात विकणार आहे. त्यामुळे एका ब्राससाठी १ हजार ७४० रूपयांचा तोटा सरकारला सहन करावा लागणार आहे. या आंदोलनाला भिवंडी तालुका रेती तांडेल मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.