ठाणे : टेमघर येथील पाणी पुरवठा केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्याने तेथे चारच पंप सुरू असून यामुळे शहराला ५० दशलक्षलीटर इतका कमी पाणी पुरवठा होत आहे. परिणामी, गुरूवारी शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून दुरुस्तीनंतरही म्हणजेच रात्री वेळेत होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने केला जाणार आहे. यामुळे ठाणेकरांपुढे पाणी संकट उभे राहिल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या योजनेतून २५० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. हा स्त्रोत शहरातील पाणी पुरवठ्यासाठी महत्वाचा मानला जातो. या पाण्याचा पुरवठा दिवा वगळता संपुर्ण महापालिका क्षेत्रात करण्यात येतो. या योजनेसाठी भातसा धरणाच्या पिसे बंधारा येथून पाणी उचलण्यात येते. पुढे टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातून हे पाणी शहरातील नागरिकांपर्यंत पोहचविले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, टेमघर जलशुद्धीकरण केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बुधवारी रात्री बिघाड झाला. यामुळे तेथे चारच पंप सुरू आहेत. त्यामुळे यामुळे शहराला महापालिकेच्या योजनेतून २५० ऐवजी २०० दशलक्षलीटर इतकेच पाणी उपलब्ध होत आहे. ५० दशलक्षलीटर इतके पाणी कमी उपलब्ध होत आहे. या बिघाडामुळे बुधवार रात्रीपासून शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. गुरूवार दुपारी आणि रात्री शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. त्यामुळे ठाणेकरांना पाणी संकटाला सामोरे जावे लागले. वीज यंत्रणा दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे पाणी पुरवठा विभागाने कळवले आहे.