ठाणे : ठाणे शहरात बुधवारी रात्री विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत असतानाच, वागळे इस्टेट भागातील एका कंपनीची सुरक्षा भिंत रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या तीन वाहनांवर कोसळली. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे नुकसान झाले आहे.
ठाणे शहरात बुधवारी रात्री विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. या पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू होता. वाऱ्यामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. याच पावसादरम्यान, वागळे इस्टेट भागातील एका कंपनीची सुरक्षा भिंत रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या तीन वाहनांवर कोसळल्याची घटना घडली. वागळे इस्टेट भागातील रस्ता क्रमांक २७ येथील , सी.पी. तलाव जवळ इक्विनोक प्रा.लि. कंपनी आहे. या कंपनीची अंदाजे ५० फूट लांब आणि ६ फूट उंच सुरक्षा भिंत आहे.
या भिंतीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर परिसरातील नागरिक वाहने उभी करतात. अशाच प्रकारे बुधवारी रात्री नागरिकांनी रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली होती. दरम्यान, रात्रीच्या वेळेस कंपनीची सुरक्षा भिंत रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या तीन वाहनांवर कोसळली. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे नुकसान झाले आहे. यामध्ये दोन कार आणि एका रिक्षाचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन याठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव धोकापट्टी लावून हा परिसर बंद केला. घटनास्थळी पडलेल्या सुरक्षा भिंतीच्या विटा रस्त्यावरती पडलेल्या होत्या.
त्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. तसेच घटनास्थळी पडलेला राडारोडा कंपनीकडून उचलण्यात येणार असल्याचे कंपनीच्या सुपरवायझर यांनी कळविले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.