निष्ठेच्या दरवाजाजवळ कुठलीच माघार नसते. कुठलेच व्यवहार आणि लोभ नसतात. असते ती केवळ निष्ठा, आत्मसन्मान, समाजाचा उत्कर्ष आणि संघटना. पण, जेव्हा आपल्यांनीच केली गद्दारी आणि घात करून रातोरात झाले सत्ताधारी. गुरुवर्य तुम्ही म्हणजे अर्जुन घडवणारा द्रोणाचार्य खरा. ज्यांना घडवले तुम्ही त्यांनीच संघटनेचा केलेला अपमान नव्हे बरा आणि म्हणून आमचा आनंद हरपला, असा संदेश असलेली नवीन चित्रफित शिवसेना खासदार राजन विचारे यांनी प्रसारित करत त्याद्वारे शिंदे गटावर अप्रत्यक्षणे टिका केली आहे.

हेही वाचा – “आगामी निवडणुकीत आनंद दिघे चमत्कार दाखवतील आणि…”, खासदार राजन विचारेंचा शिंदे गटाला सूचक इशारा

शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे गटासोबत राहिलेले खासदार राजन विचारे यांनी काही दिवसांपुर्वी एक चित्रफित प्रसारित करत दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. या चित्रफितीच्या माध्यमातून त्यांनी शिंदे गटावर टिकाही केली होती. त्यापाठोपाठ आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विचारे यांनी नवीन चित्रफित प्रसारित केली असून त्यामध्येही आज आमचा आनंद हरपला असा उल्लेख करत दिघे यांच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे. तसेच शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ‘तुमचा प्रवास पाहायला गुरुवर्य (आनंद दिघे) आम्ही, याची देही याची डोळा. श्वासाच्या अंतिम क्षणापर्यंत ही तुम्ही धरली फक्त आणि फक्त सत्याची कास. अखंड शिवसेनेबद्दलची आस. त्याला आघात निष्ठेची साथ. गुरुवर्य तुम्ही म्हणजे अस्सल मातीतला माणसांसाठी लढणारा माणूस खरा. तुम्ही गेलात आणि शिवसैनिकांत पाझराला अश्रूंचा झरा आणि आज आमचा आनंदच हरपला’ असे विचारे यांनी चित्रफितीत म्हटले आहे.

हेही वाचा – कल्याण : गणेशोत्सवात मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या पोलिसांच्या सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बाळासाहेब म्हणजे तुमचे कुलदैवत. अंतिम त्यांचा शब्द. तोच झेलत तुम्ही ठाण्यात भगवा कायम ठेवला. तुम्ही सामान्य शिवसैनिक पेटवला. हिंदुत्वाचा ज्वालामुखी तो तुम्ही जागवला. आमचे सर्वांचे गुरुवर्य तुम्ही. निष्ठेचे दैवत तुम्ही. तुम्ही आम्हापासून दूर गेलात आणि तुटला आम्हाला एकसंघ ठेवणारा दोरा. आमचा आज आनंदच हरपला. गद्दारांना क्षमा नाही म्हणून तुम्ही गरजला. रुद्र अवतार पाहून तुमचा अख्खा महाराष्ट्र हादरला. कसलीच चूक नसताना टाडामध्ये तुरुंगात असताना मागितली असती माफी तर तुम्ही सुटलाही असता. पण निष्ठेच्या दरवाजाजवळ कुठलीच माघार नसते. कुठलेच व्यवहार आणि लोभ नसतात. असते ती केवळ निष्ठा, आत्मसन्मान, समाजाचा उत्कर्ष आणि संघटना. पण जेव्हा आपल्यांनीच केली गद्दारी आणि घात करून रातोरात झाले सत्ताधारी. गुरुवर्य तुम्ही म्हणजे अर्जुन घडवणारा द्रोणाचार्य खरा. ज्यांना घडवले तुम्ही त्यांनीच संघटनेचा केलेला अपमान नव्हे बरा आणि म्हणून आमचा आनंद हरपला’. अशी टिका त्यांनी शिंदे गटावर केली.